तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक म्हणाले आहेत. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीच्या सर्व ५४ नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे विधीमंडळ अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्ता स्थापनेसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्यात राष्ट्रपती लागवट होण्याची दाट शक्यता
नेमके काय म्हणाले नवाब मलिक?
‘आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडूण आलेल्या ५४ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. या राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर पर्यायी सरकार निर्माण करण्यात यावा असा ठराव करण्यात आला. राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापनेला निमंत्रण दिले असल्याचे कालच आम्ही सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार निर्माण होऊ शकत नाही. मात्र, काँग्रेसची भूमिका यासाठी महत्वाची असेल’, असे नवाब मलिक यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.