अवघ्या दोनच दिवसांपूर्वी वनविभागाकडून महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नसल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी दुपारच्या सुमारास ठाण्यामध्ये तब्बल १५ पाणबगळा जातीतील पक्षी मृत अवस्थेमध्ये सापडल्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. बर्ड फ्लूचा ठाण्यात शिरकाव झाला की काय? अशी चर्चा आता ठाण्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नसून त्यांना तपासणीसाठी मुंबईच्या पशूसंवर्धन रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ठाणेकरांमध्ये काहीसं भितीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येत आहे.
बुधवारी ६ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर वाघबीळ परिसरामध्ये असलेल्या विजय वाटिक इमारतीच्या आवारात हे १५ पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. या पक्षांना लागलीच मुंबईतील पशुसंवर्धन रुग्णालयामध्ये (Animal husbandry hospital) दाखल करण्यात आलं आहे.