बुऱ्हाण वाणी आणि अफजल गुरू सारख्या दहतवाद्यांचा, देशद्रोह्यांचा हवाला देत काश्मीरमधील तरूणांवर बऱ्याच वेळा बोटं दाखवण्याचा प्रकार होतो. काही दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानी तरूणांचा सहभाग दिसून आल्यास त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. पण, औरंगेजेब सारखे जिगरबाज, देशासाठी प्राणांची बाजी लावणारे तरूण आज देखील जम्मू – काश्मीरमध्ये आहेत. जे आपलं सर्वस्व पणाला लावून देशासाठी प्राणांची बाजी लावण्यासाठी तयार आहे. काश्मीरी तरूणांच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना जम्मू – काश्मीरमध्ये घडली आहे. जम्मू – काश्मीरमधील एक नव्हे, दोन नव्हे तर २५९ तरूण भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये हे तरूण आता देशाच्या सेवेत रूजू झाले आहे. यासाठी त्यांना वर्षभर खडतर ट्रेनिंग देखील देण्यात आली. सैन्यात भरती झाल्यानंतर तरूणांनी केलेल्या भारत मातेच्या जयघोषानं जम्मू – काश्मीरमधील डोंगर – दऱ्या देखील थरारून उठल्या. भारत मातेच्या जयघोषानं निर्जीव असलेले डोंगर देखील सजीव झाले का? असा काही काळासाठी भास झाला. अभिमानानं ऊर भरून यावा असा हा सोहळा पाहण्यासाठी तरूणांचे पालक आणि मित्र परिवार देखील हजर होता.
जम्मू – काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्याला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. अनेक वेळेला स्थानिकांचा देखील दहशतवादी कारवायांसाठी उपयोग केला जातो. पण, आता आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला बधणार नाही, तुमच्या प्रत्येक कृतीला जशास तसे आणि सडेतोड उत्तर दिले जाईल असं उत्तर या जवानांनी सैन्यात भरती होऊन दहशतवाद्यांना दिलं आहे. २५९ तरूण सैन्यात भरती झाल्यानं साऱ्या राज्याचा ऊर आता अभिमानानं भरून आला आहे.