घरमहाराष्ट्रसायकल दुरुस्तीचे काम करून मुलींना केले उच्चशिक्षित

सायकल दुरुस्तीचे काम करून मुलींना केले उच्चशिक्षित

Subscribe

सायरा सय्यद यांच्या कष्टाला फळ

आई ही मुलांची पहिली गुरू असते. तिच्यामुळेच खर्‍या अर्थाने या जगाची ओळख मुलांना होते. वडिलांसोबत आईने केलेल्या काबाडकष्टामुळे मुलांना जगण्याची दिशा मिळते. आईने केलेले संस्कार आणि संगोपनामुळे मुले जगात प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरू शकतात. अशाच एका माऊलीने जीवनभर खस्ता खाऊन आपल्या दोन मुलींना संगणक अभियंता केले. तर अजून एका मुलीला उच्चशिक्षित बनवले. सायरा नजीर सय्यद असे ५७ वर्षीय या माऊलीचे नाव आहे. मुलींच्या शिक्षणासाठी गेली ३६ वर्षे सायरा पिंपरी येथे सायकल दुरुस्तीचे काम करत आहेत. त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले असून आज त्यांच्या तिन्ही मुली उच्चशिक्षीत आहेत.त्यातील दोघींची लग्नही झाली आहेत
सायरा नजीर सय्यद या पिंपरी चिंचवड येथे रहातात. त्यांचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८२ साली त्यांचा निकाह नजीर यांच्याशी झाला. निकाहानंतर तीन महिन्यांतच त्यांना केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळाल्याचे पत्र आले. मात्र सासर्‍याच्या मंडळींनी त्यांना नोकरी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांची ती संधी हुकली. त्यानंतर काही वर्षांनी पतीला दुर्धर आजार जडला. त्यामुळे पतीला काही काम करता येत नव्हते. मुलींना शिक्षण देण्याचे ठरवले. मात्र पतीचा त्याला विरोध होता. तो विरोध झुगारून मुलींना सायरा यांनी शाळेत पाठवले. त्यासाठी त्यांनी सायकल दुरुस्तीचे काम घरासमोरील मोकळ्या जागेत सुरू केले.
व्यवसाय जोमाने चालत होता. महिन्याकाठी हजार रुपये मिळायचे. तेव्हा पंचर काढायला ६० पैसे घेत असत, असे सायरा यांनी सांगितले. आता तेच पंचर काढायला २० रुपये घेतले जातात. मुलींनी १०वी पर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत पूर्ण केले. मुलींनी कोणत्याही गोष्टींसाठी हट्ट केला नाही. मिळेल त्यावर समाधान मानले.एकेकाळी मुलींनी दुसर्‍यांनी दिलेले जुने कपडे घालून दिवस काढले, हे सांगताना सायरा यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र मुलींनी कधी हेच पाहिजे म्हणून त्रास दिला नाही. आज मला मुलींचा अभिमान वाटतो, असे सायरा म्हणाल्या.
मुलींनी अगोदर मिळेल ते काम केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेतली. त्या आज उच्च शिक्षित असून वहिदा आणि साजीदा या हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यकरत आहेत. तर माझी तिसरी मुलगी निलोफर मेडिकल व्यवसायात आहे. वहिदा सर्वात लहान असून माझ्या मोठ्या दोन्ही मुलींचा निकाह झाला आहे. हे सर्व पाहून आनंद होतो. मुलींनी भरभरून प्रेम दिले. माझ्या कष्टाचे फळ मिळाले. शिक्षणाला मरण नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्या, असा संदेश सायरा देतात.

मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका

सायरा यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. व्यवसाय असल्याने पैशाची चणचण नव्हती. कोणताही व्यवसाय करा,पण तो मन लावून करा. त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका. हातपाय चालतात तोपर्यंत मी काम करत राहणार आहे. कोणावर अवलंबून राहणार नाही, अशा  भावना सायरा सय्यद यांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -