देशातील तरुणाला बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना प्रधानसेवक भजी-पकोडा विकण्याचा सल्ला देतात. ही बेरोजगारांची क्रुर थट्टा आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून युवक, महिला, सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून येत्या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेऊन भाजपाला घरी बसवेल,असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
वाचा : अजित पवार आणि पार्थ एकाच व्यासपीठावर; राजकारणात एंट्री होणार?
गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्या
पवार म्हणाले की, २१ व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्त्रो जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्ती ‘आंबा खाण्याचा’ सल्ला देते. अशा बुध्दीवंतांची किव येते, असे म्हणत भिडे गुरुजींवर नाव न घेता टीका केली. युवकांना सल्ला देताना ते म्हणाले, बेरोजगारांनी नाउमेद न होता नैराशयातून व्यसनाधीन होऊ नये. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संयम बाळगावा. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात. इच्छा शक्तीच्या जोरावर आणि आलेल्या संधीचा योग्य वापर करून यश सहज प्राप्त करता येते. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये रिक्त जागांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये ५०० जागा रिक्त असून रयत शिक्षण संस्थेत २५०० हजार पदे रिक्त आहेत. सरकारने याबाबत धोरण निश्चित करून गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अस पवार म्हणाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.