जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असताना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात २१ दिवसांकरता लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान तसेच संचारबंदी लागू असताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाई करण्यात सुरूवात केली आहे. अशीच कडक कारवाई सांगलीत होताना दिसत आहे. सांगलीत विनाकारण दुचाकी वाहन घेऊन बाहेर फिरणाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अवघ्या चार तासात तब्बल ३०० वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरातील रस्त्यांवर विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगलीत सर्व सेवा घरपोच उपलब्ध करून दिल्या असल्याने जीवनावश्यक वस्तू, किराणा माल आणि भाजी खरेदीसाठी कारण नसताना वाहन घेऊन घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करत त्यांची वाहनं जप्त करण्यात येतील, अशा सूचना दिल्या असताना काही कारणं सांगून वाहनं घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
हेही वाचा – LockDown: उपासमारीने मजूर महिला बेशुद्ध; कॉन्स्टेबलने रक्त देऊन वाचवला जीव
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी पोलिसांनी अवघ्या चार तासात ३०० गाड्या जप्त केल्या आहेत.