भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप देखील सुरू आहेत. शिवसेनेकडून तर भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. असं असतानाच अवघ्या महिन्याभरापूर्वी दोन्ही पक्षांकडून स्वबळाची भाषा केली गेली. मात्र आता पुन्हा एकदा युतीसाठीची प्रयत्न सुरू झाले आहेत. एकीकडे शिवसेना नेते स्वबळावर ठाम असतानाच भाजपकडून मात्र युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आता तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘युतीसाठी शिवसेनेच्या नेत्यांना सुबुद्धी मिळो’, असं वक्तव्य केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुम्ही हे वाचलंत का? – अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा!
‘आम्हाला युती हवी आहे’
नाशिकच्या त्र्यंबकमध्ये गिरीश महाजन निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी युतीबाबत गिरीश महाजनांना विचारले असताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ‘युतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. अगदी कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत सगळ्यांची युती व्हावी अशी इच्छा आहे. त्यामुळेच निवृत्तीनाथ महाराजांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी’, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
पाहा गिरीश महाजन काय म्हणतायत! ‘सुबुद्धी मिळो’! pic.twitter.com/3iGnnHCbP3
— My Mahanagar (@mymahanagar) January 31, 2019
अमित शहांचा फोन? छे छे!
दरम्यान, अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना युतीचं साकडं घालण्यासाठी फोन केला, या चर्चेला गिरीश महाजन यांनी नकार दिला आहे. ‘निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या अफवा उठतच असतात. जर असं काही झालं, तर ते सगळ्यांसमोर जाहीर सांगितलं जाईलच. मात्र असं काही झालेलं नाही’, असं ते म्हणाले.
पाहा अण्णा काय म्हणाले – गिरीश महाजन परत जा!
‘अण्णांच्या ८० टक्के मागण्या पूर्ण’
अण्णा हजारेंच्या उपोषणावर देखील गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ‘अण्णांशी माझी चर्चा झाली आहे. स्वामीनाथन आयोग, लोकपाल, लोकायुक्त अशा जवळपास ८० टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा मी मुख्यमंत्र्यांचं एक पत्र घेऊन अण्णा हजारे यांच्याकडे जाणार आहे. उपोषण मागे घेण्याची विनंत मी त्यांना करणार आहे’, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.