घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे म्हणाले, 'हा मुंडे साहेबांचा अपमान'

धनंजय मुंडे म्हणाले, ‘हा मुंडे साहेबांचा अपमान’

Subscribe

'भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक अद्यापही सरकारकडून बांधण्यात आलेला नाही. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचे ऊस मजुरांचे महामंडळ निर्माण करण्याचे योजिले होते. परंतु तेही रद्द झाले, त्यामुळे हा गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे', असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

‘गोपीनाथा मुंडे यांच्या स्मारकाचे काय झाले?’, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारणार, असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. परंतु, ते आश्वासन पूर्ण झालेले नाही, त्यामुळे हा मुंडे साहेबांचा अपमान आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे येऊन पोहोचली आहे. कर्जत येथे झालेलया जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाविषयी सवाल केले आहे.

पंकजा मुंडेंना टोला

या मुद्यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनादेखील टोला लगावला आहे. ‘अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा घात आहे की अपघात? ते सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे धनंजय मुंडे म्हणाले. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहित पवार,नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके-पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडपाटील आदींसह कर्जत, जामखेड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

धनंजय मुंडे म्हणाले की, ‘स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनाला साडे चार वर्षे झाली. सरकारच्या वतीने औरंगाबादमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येणार होत. काय झाले त्या स्मारकाचे? गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊस मजुरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते. तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे’, असे ते म्हणाले. यापुढे धनंजय मुंडे म्हणाले की, ‘देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. हा दावा मी नाही, तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानेच केला आहे. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला. सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही’. या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नसल्याचा दावा मुंडे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -