दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला लासलगाव मतदारसंघातील ४२ गावांमध्ये निवडणुकीचे किंवा प्रचाराचे कोणतीही धामधूम दिसत नाही. यामुळे सर्वत्र शांतता दिसत आहे. १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली तरी आघाडी किंवा युतीच्या कोणत्याही उमेदवाराची सभा किंवा रॅली या परिसरात दिसून आली नाही.
तापमानाने चाळीशी गाठली पण निवडणुकीचे वातावरण म्हणावे तसे तापले नाही. सर्वत्र भयाण शांतता दिसत आहे यामुळे शोले चित्रपटातील एके हंगल यांचा डायलॉग ‘इतना सन्नाटा क्यू है भाई‘, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. दिंडोरी मतदारसंघात मागील तीन पंचवार्षिकचे नेतृत्व भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने उमेदवारांची अदलाबदल होऊन राष्ट्रवादीकडून धनराज महाले तर युतीकडून डॉ. भारती पवार व माकपचे जीवा पांडू गावित नशीब अजमावत आहे.
उमेदवारांनी ताकद दिंडोरी, कळवण, सुरगाणा या भागावर केंद्रित केले असून चांदवड, नांदगाव, येवल्याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे दिसते. येवला- लासलगाव मतदारसंघात समाविष्ट असलेले ४२ गावांत कोणत्याही पक्षाने प्रचारात आघाडी घेतली नाही. किंबहुना प्रचार सभा अथवा रॅली काढलेली नाही. यामुळे या परिसरात निवडणूक आहे की नाही असे वातावरण तयार झाले आहे.