एप्रिलमध्येच चाळीशी गाठलेल्या उकाड्याने बुधवारी, १० एप्रिलला एका शाळकरी विद्यार्थिनीचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना पुढे आली. ऐन परीक्षेच्या काळातच ही घटना घडल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
अकरावीत स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या कोमल देविदास करंजकर हिचे उष्माघाताने मृत्यू झाला.
कोमल बुधवारी (१० एप्रिल) दुपारी क्लासकरून घरी आल्यावर तिने जेवण केले. सायंकाळी तिची प्रकृती अचानक बिघडली. यातच तीचे मृत्यू झाला. येवल्यात गेल्या १५ दिवसात दोन बळी गेल्याची घटना घडली आहे. यामुळे पालक वर्गात मोठे चिंतेचे वातावरण आहे. येवल्याचा पारा ४० अंशावर गेल्याने दुपारी शहरात अनेक भागात रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच शाळा- महाविद्यालयांच्या परीक्षादेखील चालू आहेत. त्यातच उष्माघाताने येथे विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे
प्रत्येकाने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. तसेच डोके आणि कान रुमालाने बांधून काम करावे. शेतात किंवा बाहेर काम करताना मजुरांनी टोपी उपरणेचा वापर करावा. ताक, उसाचा ताजा रस यांचे प्रमाण वाढवावे. – डॉ. गोविंद भोरकडे