गेल्या काही वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चा हे अंदोलन देशभर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेने पाऊले उचलत होती. मात्र, मराठा समाजाला सक्षम आरक्षण देण्याबाबत सरकारला विसर पडला असल्याने सरकारच्या फसवेगिरीमुळे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या युती सरकाराच्या विरोधात प्रचार करणार, असे मराठा मोर्चा आणि ठोक मोर्चा यांनी पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निर्णय घेण्यात आला आहे.
सरकार विरोधी प्रचार करण्याचे आवाहन
या पत्रकार परिषदेत संजय सावंत, विजय घाडगे आणि मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या वतीने एकूण ५८ मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांमध्ये लाखोनी मराठा बांधव शांततेत रस्त्यावर उतरले होते. अंदोलना दरम्यान ४२ जण निधन पावले. मात्र, आजूनही सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणालाही नोकरी सरकारने दिलेली नाही. तसेच आंदोलना वेळी १३ हजार ७०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हेसुद्धा अजूनही मागे घेण्यात आलेले नाहीत. तसेच मराठा आरक्षण विरोधात कोणताही पक्ष किंवा उमेदवार असेल तर त्याला निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक मराठा घरात जाऊन सरकार विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
विरोधकांना पाठिंबा देणार
मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले की, मराठा मोर्चा आंदोलन सुरू होण्याच्या वेळीस आम्ही कोणत्याही नेत्यासोबत किंवा पक्षासोबत आंदोलनात उतरणार नाही ही भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान या बैठकीत त्यांना प्रवीण गायकवाड यांना पाठिंबा देणार का असे विचारले असता त्यांनी पाठिंबा द्यायचा किंवा नाही हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. सत्ताधारी सरकार विरोधात उमेदवार निश्चित झाल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही हे पाहून जाहीर करू असे त्यांनी सांगितले.