शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कुटुंबीयांच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, लोणावळा, खंडाळा परिसरातील स्थावर मालमत्तांवर बॅंकांकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. विविध बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाची एकूण ६४ कोटी रुपयां पर्यंतची तकबाकी भरता न आल्याने त्यांच्या मालमत्तांवर ही जप्तीची करावाई करण्यात आली आहे. मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश जोशी यांच्यासह माधवी उन्मेष जोशी आणि अनघा मनोहर जोशी या त्यांच्या कुटुंबीयांना जप्ती संदर्भात बॅंकाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांच्या कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टने बॅंकांकडून कर्ज घेतले होते. तसेच या कर्जाच्या बदल्यात त्यांनी काही स्थावर मालमत्ता बॅंकांकडे तारण म्हणून ठेवल्या होत्या. मात्र कर्जाची रक्कम वेळेत भरता न आल्याने ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या आहेत बॅंका
त्यांच्या कोहिनूर एजूकेशन ट्रस्टने बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या कडून कर्ज घेतले होते. तसेच बॅंकांचे हे कर्जभरण्यासाठीचे उन्मेश जोशी, माधवी उन्मेश जोशी, अनघा उन्मेश जोशी हे हमीदार होते. मात्र कर्ज वेळेत भरता न आल्याने काही बॅंकाकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जोशी कुटुंबीयांचे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे १२ कोटी ७९ लाख, स्टेट बॅंकेचे ३८ कोटी ६३ लाख तसेच बॅंक ऑफ इंडियाचे १३.१८ कोटी रुपयांचे कर्ज असे जवळपास तिन्ही बॅंकांचे मिळून एकूण ६४ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज थकले आहे.
बॅंकांचे आदेश
या जप्ती नंतर बॅंकांकडून जप्त केलेल्या मालमत्तांबाबत कोणताही व्यवहार करण्यास मनाई केली आहे. कोणताही व्यवहार केल्यास त्यासाठी बॅंकेची पूर्व परवानगी तसेच बॅंकेला विश्वासात घेणे गरजेचे असल्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, बॅंकेला न कळवता व्यवहार करण्यात आल्यास आसा व्यवहार ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे बॅंकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.