रक्तदान करताना एखाद्याला एचआयव्ही असल्याचं निदान झाल्यास त्या रुग्णाला रक्तपेढ्यांतर्फे आयसीटीसी म्हणजेच इंटीग्रेटेड काऊन्सिलींग अँड टेस्टींग सेंटरमध्ये पाठवणं बंधनकारक आणि गरजेचं आहे. पण, मुंबईतील अनेक रक्तपेढ्या एचआयव्ही रुग्णांना आयसीटीसी केंद्रात पाठवत नसल्याचं समोर आलं आहे. राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणने (एसबीटीसी) केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. यानंतर एसबीटीसीने सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठवून याबाबत सूचना देत एचआयव्ही रुग्णांना आयसीटीसी केंद्रामध्ये पुढच्या उपचारांसाठी पाठवलं जावं असे आदेश दिले आहेत.
तीन वर्षांत ७८ जणांना झाला एचआयव्ही
उन्हाळाच्या सुट्टीत अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी तरुण मंडळी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येतात. रक्तदानाच्या चाचणीतूनच अनेकदा रुग्णांना एचआयव्ही झाल्याचं निदान होतं. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१७ या तीन वर्षांत ७८ जणांना एचआयव्ही झाल्याचं समोर आलं आहे.
केंद्राच्या नियमावलीनुसार, एचआयव्ही रक्तदाता आढळून आल्यास रक्तपेढ्यांनी त्याचं समुपदेशन करून त्याला पुढील उपचारासाठी आयसीटीसी केंद्रात पाठवणं आवश्यक आहे. पण, काही रक्तपेढ्या या नियमांचं उल्लंघन करून रुग्णांना याठिकाणी पाठवत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे, आता सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठवून याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
– डॉ. अरुण थोरात, सह-संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
हेही वाचा – रक्तदानासाठी केईएमच्या डॉक्टरांचा पुढाकार
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य म्हणाल्या की, ‘‘मुंबईत सध्या ५८ रक्तपेढ्या कार्यरत आहेत. यातील फक्त २१ रक्तपेढ्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. पण, आता एसबीटीसीने मुंबईसह राज्यभरातील सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना पत्र पाठवून सूचना केल्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल.
– डॉ. श्रीकला आचार्य, अतिरिक्त प्रकल्प संचालिका, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी