तालुक्यातील वीज केव्हा जाईल व केव्हा येईल याचा काही नेम नाही. १५ ऑगस्ट रोजी देखील सकाळी सातच्या सुमारास वीज गेल्यामुळे तालुक्यातील नेरे फिडरमधील शेकडो गाव अंधारात गेली होती. दुपारी 1 वाजता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
पंधरा ऑगस्ट रोजी वीज पुरवठा सकाळीच खंडित झाल्याने रक्षाबंधनात बहिणींना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच देशभरात ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात असताना नेरे फिडर मध्ये विजेविना स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. वीज नसल्याने जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईलची टॉर्च, मेणबत्तीच्या उजेडात शासकीय कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक,विद्यार्थी यांना बसावे लागले. महावितरणच्या या ढिसाळ कारभाराचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. किमान स्वातंत्र्य दिन व रक्षा बंधनाच्या दिवशी तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता दादा यमगर यांना विचारले असता साईनगर येथे कंडक्टर तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला असल्याचे त्यांनी सांगितले.