घरमुंबईमनसे विधानसभा निवडणूकीत ५० ते ६० जागा लढणार?

मनसे विधानसभा निवडणूकीत ५० ते ६० जागा लढणार?

Subscribe

मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास मनसे ५० ते ६० जागांवर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या मनामध्ये विधानसभा निवडणूक लढवावी की लढू नये, असा संभ्रम सुरू असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत काही उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; विधानसभा निवडणूक लढू नये, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे होते. मात्र, काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांचे मत बदलल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, जर मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास मनसे ५० ते ६० जागांवर निवडणूक लढणार असल्याचेही समजते. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पंढरपूर, वणी तसेच काही ग्रामीण भागामध्ये जिथे मनसेची ताकद आहे, अशा ठिकाणी मनसे आपले उमेदवार देऊ शकते. मुंबईतील माहीम, विक्रोळी या भागात देखील मनसे आपला उमेदवार देणार आहे. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीबाबत आघाडीकडून मनसेला कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे देखील एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले आहे.

माहीममधून ३ उमेदवार इच्छुक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघामध्ये मनसेच्या नितीन सरदेसाई यांना जवळपास ६ हजार मतांनी शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. सदा सरवणकर यांना यावेळी ४६ हजार २९१ तर मनसेच्या नितीन सरदेसाई यांना ४० हजार ३५० मते मिळाली होती. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणूकीत मतदारसंघात जर काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर मनसेचा विजय सुकर होईल, असे मनसेकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघामध्ये मनसेकडून संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि नितीन सरदेसाई हे तीन जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यांनी राज ठाकरे यांना देखील तसे कळवल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

काँग्रेस-राष्ट्रवादीची मिळणार मदत?

मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत विधानसभा निवडणुकीत यावे, अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती तर काहींचा विरोध होता. तसेच जर काँग्रेस सोबत गेलो तर मनसेला पडणारी मते देखील पडणार नाही, असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत जिथे मनसेचा उमेदवार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे थोडक्यात पराभूत झाला अशा काही जागांवर आघाडीने उमेदवार न देता मनसेला मदत करावी, असे देखील सांगण्यात येणार असल्याचे कळत आहे. एवढच नाही तर आघाडी देखील यावर सहमत असल्याचे समजत आहे.


हेही वाचा – मनसे विधानसभा लढणार? उद्या होणार राज गडावर बैठक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -