भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे राज्य आणि देशभरातून लाखो नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील बीआयटी चाळला भेट दिली. परळ दामोदर हॉलजवळ ही चाळ आहे. याच चाळीच्या इमारतीत दुसऱ्या माळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते. १९१२ ते १९३४ या कालावधीत म्हणजे २२ वर्षे बाबासाहेब येथे वास्तव्यास होते. त्यामुळे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी बीआयटी चाळला भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – लोकशाहीच्या कसोटीच्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही रहा – राज ठाकरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील आज सकाळी चैत्यभूमीवर गेले होते. तिथे जाऊन सर्वांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक चैत्यभूमीवर येतात.
‘डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला. त्यांचे जीवन हे अग्नीकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांचा वितारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल’, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची प्रतिकृती तयार