भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ च्या फरकाने पराभूत झाला. भारताच्या या दारूण पराभवानंतर सध्या भारतीय संघ कसोटी सामन्यांसाठी तयारी करत आहे. सध्या विश्रांतीदरम्यान बरेच खेळाडू आपल्या पत्नी आणि प्रेयसीसोबत सोशल मीडियावर फोटो टाकताना दिसत आहेत. मात्र आता त्यांना या सर्व एन्जॉयमेंटला किमान महिनाभरासाठी मुकावे लागणार आहे. कारण भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने संपेपर्यंत भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा प्रेयसीला भेटता येणार नसल्याचे आदेश संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आले असल्याची माहिती ‘मुंबई मिरर’मधील एका वृत्तातून समोर आली आहे.
Just strolling around the street with these two strangers ? pic.twitter.com/TlEOFqFzR5
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 19, 2018
का दिले बीसीसीआयने आदेश?
भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय घेण्यामागील कारण हे बहुधा याआधी घडलेल्या घटना असावं. याआधी ‘भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामना पहायला आल्यास भारताचा पराभव होतो’ अशी टिका भारतीय चाहत्यांकडून करण्यात आली होती. यासारख्या टिकांना पूर्णविराम लागावा यासाठी बहुधा हा निर्णय घेतला असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तविली जात आहे.
इंग्लंडकडून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत झाल्यामुळे आता भारतासाठी ही कसोटी मालिका जिंकणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. या दृष्टीने भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळावर अधिक लक्ष द्यावे या हेतूने संघ व्यवस्थापनाने असे आदेश दिले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून कसोटी सामने सुरू होणार असून एकूण पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.