भारताच्या हॉकी संघाने आक्रमक खेळ करत विश्व आणि युरोपियन विजेत्या बेल्जियमचा गुरुवारी झालेल्या सामन्यात ५-१ असा धुव्वा उडवला. हा भारताचा बेल्जियम दौर्यावरील पाचवा आणि अखेरचा सामना होता. त्यांना हे पाचही सामने जिंकण्यात यश आले.
पाचव्या सामन्यात भारताकडून सिमरनजीत सिंग (७ वे मिनिट), ललित कुमार उपाध्याय (३५ वे मिनिट), विवेक सागर प्रसाद (३६ वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (४२ वे मिनिट) आणि रमनदीप सिंग (४३ वे मिनिट) यांनी गोल केले. भारताला या सामन्याच्या पूर्वार्धात एकच गोल करता आला. मात्र, उत्तरार्धात उत्कृष्ट खेळ करत भारताने आणखी ४ गोल मारले आणि हा सामना ५-१ असा जिंकला. बेल्जियमचा एकमेव गोल ३९ व्या मिनिटाला हॅन्ड्रिक्सने केला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्या भारताने या दौर्याच्या पहिल्या सामन्यात बेल्जियमचा २-० असा पराभव केला. त्यानंतर त्यांचे सलग दोन सामने स्पेनविरुद्ध झाले, जे त्यांनी ६-१ आणि ५-१ असे मोठ्या फरकाने जिंकले. अखेरच्या दोन सामन्यांत भारताने बेल्जियमवर विजय मिळवले. चौथा सामना भारताने २-१ असा, तर पाचवा सामना ५-१ असा जिंकला.