काल गुरूवारी चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान धोनी फॅन्सला त्याचे वेगळे रूप बघायला मिळाले. एरवी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीने थेट पंचांशीच मैदानात येत वाद घातला. धोनीच्या या अनपेक्षीत वागण्यामुळे सगळ्या फॅन्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र पंचांशी घातलेल्या वादाबदद्ल धोनीला याची किंमत मोजावी लागणार आहे. आयपीएलने या प्रकरणी धोनीवर कारवाई केली आहे. या सामन्यासाठी धोनीला मानधनाच्या ५० टक्के रक्कमच देण्यात येणार आहे. मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी त्याचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे.
यासंदर्भात आयपीएलकडून एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे. ‘जयपूरमधील राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी धोनीला मानधानापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड केला जात आहे. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे धोनीने लेव्ह दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली आहे. आणि ती त्याने मान्यही केली आहे.’
Mahi will never do anything without a cause, it was need of hour, so MSDians enjoy this 'Bahubali' moment. #RRvCSK #thala #Dhoni pic.twitter.com/U4g4yWKScr
— Moti Purohit (@Moti_Purohit01) April 12, 2019
काय आहे २.२० नियम
आयपीएलच्या २.२० नियमानुसार खेळ भावनेला धक्का पोहचवणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्यात येते. धोनीवर करण्यात आलेली कारवाई ही लेव्ह टू ची आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्यांदा दोषी अढळल्यास करण्यात येणारा कमाल स्वरुपातील दंड आहे.
काय घडलं मैदानात
अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. यावेळी मैदानात दोन्ही पंचांमध्ये प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. हा सर्व प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनी मैदानात आला.
पंच उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस चेंडू नो-बॉल असल्याचं घोषित केलं. मात्र दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा चेंडू नो-बॉल नसल्याचं म्हटलं. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.