भारतीय संघाच्या यशात मुंबईच्या अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर अशा अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला आहे. असे असले तरी मुंबईचे अनेक असे खेळाडू होते जे भारतासाठी खेळायला हवे होते, पण त्यांना कधी संधीच मिळाली नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजुमदार. अमोलने रणजी ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा करूनही तो भारतासाठी एकही सामना खेळाला नाही. तर सध्याच्या मुंबई संघात सिद्धेश लाड हा असा खेळाडू आहे जो सातत्याने चांगले प्रदर्शन करतो आहे. मात्र, त्याची भारत ‘अ’ संघातही निवड झालेली नाही. बीसीसीआयने मुंबईच्या खेळाडूंवर नेहमीच अन्याय केला आहे असे वक्तव्य करत भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आशा आहे लाडवर अन्याय होणार नाही
गावस्कर म्हणाले, “सिद्धेश लाडने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. मुंबईचा संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याने आपला खेळ उंचावत संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. असे असतानाही त्याची भारत ‘अ’ संघातही निवड झालेली नाही हे दुर्दैवच. पण हे काही आताचे नाही. मुंबईच्या खेळाडूंवर नेहमीच अन्याय झाला आहे. इतर राज्यांतील खेळाडूंना साधारण कामगिरी करूनही भारतीय संघात संधी मिळते, पण मुंबईच्या खेळाडूंना ती मिळत नाही. मला आशा आहे की लाडवर अमोल मुजुमदारवर झाला तसा अन्याय होणार नाही.”