एक शून्य दुसर्या शून्याच्या आश्रयाला गेला तर आश्रयदाता ही शून्यच होईल, असा टोला आशिष शेलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावला आहे. ठाण्याच्या स्वामीनारायण सभागृहात भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले होते.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर या ठिकाणी उमेदवारी मागे घेत मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसने छुपा पाठिंबा दिला असून काही ठिकाणी तर मनसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करताहेत, या प्रश्नावर आशिष शेलार यांनी हा टोला लगावला.
महाराष्ट्रात 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी आपण या राज्याला दिल्या. मराठवाडा या भागात गेल्या अनेक वर्षे दुष्काळ पाहिला या भागात देखील भाजपकडून पाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अनेक बेघरांना घरे दिली, ग्रामीण भागात विकास कामे केली, समृद्धी महामार्ग याचे देखील काम सुरू आहे. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले. मेट्रो हा प्रकल्पात आपण वेग आणला. मेट्रो एमएमआरडीएच्या रिजनमध्ये नेली, कर्ज आणि महसूल वेळेत पूर्ण केले, रोजगारकडे या सरकारने लक्ष दिले, मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वाना एकत्र येऊन भाजप सरकारने पाठपुरावा या सरकारने केला, असे शेलार म्हणाले.
शेतकर्यांची कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात किती केली गेली? असा प्रश्न शेलार यांनी विचारला. सहकारी बँकांच्या स्थितीवरूनही त्यांनी पवार यांच्यावर टीका केली. आरे बाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही, मी उमेदवार आहे, असे शेलार म्हणाले. रामजन्मभूमीबाबतचा वचननामा युती पूर्ण करेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.