घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या जाहीरनाम्यातून भाजपला शह!

शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून भाजपला शह!

Subscribe

शिवसेनेने जाहीरनाम्यातून भाजपच्या शेतकऱ्यांसदर्भातील योजनांना शह दिल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील अल्पभूधारक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी १० हजार रूपये जमा करण्याचे आश्वासन देत शिवसेनेने शनिवारी भाजपच्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’ला शह दिला. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण मोफत करणार, तसेच ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्रहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याची ग्वाही शिवसेनेने दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. वचननाम्यात घोषणांचा पाऊस पाडताना शिवसेनेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवा आदी घटकांसह ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हजार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रूपये जमा होणार आहेत. भाजपच्या योजनेला शह देण्यासाठी शिवसेनेने शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी १० हजार रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे, ठिबक सिंचन योजनेला उत्तेजन म्हणून तीन वर्षांसाठी १५ टक्के अनुदान देण्याचे, कृषी उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खते, बी-बियाणांच्या किंमती पुढील पाच वर्ष स्थिर ठेवण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे.

- Advertisement -

याशिवाय राज्य सरकारच्या सेवेतील सर्व स्तरावरील रिक्त पदे भरण्याचे, स्थानिकांसाठी ८० टक्के आरक्षित नोकऱ्यांसाठीच्या कायद्याची सक्तीने अंमबजावणी करण्याचे, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आवास योजना अंमलात आणून प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर उपलब्ध करून देण्याचे तसेच कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी विमानतळ पूर्णवेळ कार्यान्वित करण्याचे आश्वासन देखील वचननाम्यात आहे.

वचननाम्यातील अन्य आश्वासने

  • निराधार योजनेच्या अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार
  • राज्यात एक हजार ठिकाणी सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते
  • पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणेच आधी मैदानी नंतर लेखी परीक्षा घेणार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला बचतगट भवन उभारणार
  • ३५ वर्षांखालील युवकांना घरासाठी सिडको, म्हाडात २ टक्के आरक्षण
  • शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी २५०० विशेष बसची सेवा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -