भारताचा माजी क्रिकेटपटून सुरेश रैना याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो IPL 2020 मध्ये खेळताना दिसेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, त्याने तडकाफडकी आयपीएलमधून देखील माघार घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. त्याने अशी माघार का घेतली? अशी चर्चा सुरू झालेली असताना आता त्याने स्वत: ट्वीटरवर याचा खुलासा केला आहे. रैनाच्या काकांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावर आज ट्वीट करताना रैनाने व्यथित होत एक ट्वीट केलं आहे. ‘पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे काही झालं ते भयानक होतं. आजपर्यंत मला समजलेलं नाही की नक्की त्या रात्री काय घडलं’, असं रैनाने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पठाणकोटमध्ये राहणाऱ्या रैनाच्या आत्या आणि त्याच्या काकांवर हल्ला झाला होता. त्यामध्ये त्याच्या काकांचा मृत्यू झाला असून आत्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवाय त्याच्या भावाचा देखील मृत्यू झाला आहे.
नक्की काय म्हणाला सुरेश रैना?
आपल्या ट्वीटमध्ये रैनाने पंजाब पोलिसांना विनंती केली आहे. ‘माझ्या काकांसोबत जे झालं ते भयानक होतं. त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. माझ्या आत्या आणि दोघा भावंडांनाही गंभीर दुखापत झाली आहे. दुर्दैवाने उपचारांदरम्यान माझ्या एका भावाचा देखील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. माझ्या आत्यांची प्रकृती देखील चिंताजनक असून लाईफ सपोर्टवर आहेत. आजपर्यंत मला कळलेलं नाही की त्या रात्री नक्की काय झालं आणि कुणी केलं? माझी पंजाब पोलिसांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. किमान हे कुणी केलं हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे. गुन्हेगारांना असे अजून गुन्हे करण्यासाठी मोकळं सोडणं चुकीचं आहे’, असं रैनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Till date we don’t know what exactly had happened that night & who did this. I request @PunjabPoliceInd to look into this matter. We at least deserve to know who did this heinous act to them. Those criminals should not be spared to commit more crimes. @capt_amarinder @CMOPb
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 1, 2020
सुरेश रैना त्याला UAE मध्ये देण्यात आलेल्या हॉटेल रुमवरून नाराज असल्याचं वृत्त समोर आलं होतं. खुद्द CSK चे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचं देखील सांगितलं जात होतं. त्यामुळेच रैनाने IPL मधून माघार घेतल्याची चर्चा होत असतानाच त्याच्या नातेवाईकांवरच्या हल्ल्याचं वृत्त समोर आल्यामुळे त्याच्या माघारीचं हेच खरं कारण असल्याचं आता स्पष्ट होत आहे.