बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, असं म्हणतं संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच कर्मच तुम्हाला वनवासात नाही तर तळोजाच्या तुरुंगात घेऊ जाते, असं म्हणत त्यांनी अर्णब गोस्वामींच्या प्रकरणावरुन भाजपला सुनावलं आहे. सामनातील आजच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले, संजय राऊत?
प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराची भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही. चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून राम अयोध्येत परत आल्याची आनंदवार्ता हनुमंताचे भरतला सांगितले. त्यावेळी भरत म्हणतो, ‘मनुष्य जिवंत असला तर त्याला शंभर वर्षांनी का होईना आनंद मिळतोच!’ याचा अनुभव अनेकदा येतच असतो. एका अर्थाने भरताने जगाला आणि समाजाला संदेश दिला आहे की,’दुःखे कोसळली तरी ती सहन करावीत. खचून जाऊन आत्महत्येचे टोक गाठू नये. कारण केव्हा ना केव्हा दुःख संपतेच. पहाट होते. आपण खचून जाऊन जीवनाचाच नाश केला तर सुखाचे दिवस कसे येऊ शकतील?’ हे ‘रामायणा’चेच सार आहे. रामाला वनवास घडला. निशादराज मंथरेला आणि पैकयीला दोष देऊ लागला. त्यावेळी लक्ष्मण म्हणाल,’बाबा रे, तिला का दोष देतोस? सुख किंवा दुःख देणारे दुसरे कोणी नसते. इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. तसेच ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे’ तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंहात घेऊन जाते.