कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात १५ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ते १५ मे ला सकाळी सात वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी कर्फ्यु सुरु आहे. परंतु, आता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा (Home Delivery) सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० या कालावधीतच चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आंबा वाहतूकीस परवानगी राहील – वाहतुकी दरम्यान कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० व सायंकाळी ६.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरू राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरिता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे. सदर रास्त भाव दुकान, आंबा वाहतूक व शिवभोजन केंद्र याठिकाणी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६०(४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.