घरफिचर्सलोकप्रिय समाजवादी नेते यदुनाथ थत्ते

लोकप्रिय समाजवादी नेते यदुनाथ थत्ते

Subscribe

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली

यदुनाथ थत्ते यांचा आज स्मृतिदिन. 5 ऑक्टोबर १९२२ रोजी नाशिकमध्ये जन्मलेले यदुनाथ थत्ते हे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि लोकप्रिय समाजवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला होता. त्यांनी राष्ट्र सेवादलासाठीही मोठे योगदान दिले होते.

साधना साप्ताहिकातली पत्रकारिता सांभाळून त्यांनी पुष्कळ लेखन केले. त्यांनी लिहिलेली डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीश्चंद्र बोस यांची चरित्रं खूप गाजली. ऑरिसन स्वेट मार्डेनच्या ‘पुशिंग टू दी फ्रंट’ या पुस्तकावर आधारित थत्ते यांनी लिहिलेली ‘पुढे व्हा’ ही तीन भागांतली पुस्तकमाला प्रचंड लोकप्रिय ठरली होती. साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी, समर्थ व्हा, संपन्न व्हा, आपला मान आपला अभिमान, विनोबा भावे अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. लहान मुलाने जेवढ्या उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तेवढ्याच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्ताएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

- Advertisement -

नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तमानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्वसंपन्न पत्रकार. असे संपादकीय नमुने महाराष्ट्राने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हे या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्वसंपन्न लेखक होते. त्यांची एकूण दीडशे पुस्तके प्रकाशित झाली. त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणार्‍या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लीम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकेही त्यात होती. मात्र, या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही होता.

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली, याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये, ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणार्‍या यदुनाथांना ती मान्य होणारीही नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई त्यात येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेड्यापाड्यांत ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठ्या कार्यकर्त्यांची नावेही त्यात येतात. या यादीतल्या सार्‍यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते. अशा या महान चरित्रकाराचे 10 मे 1998 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -