नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन आता राजकारण रंगत आहे. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ज्ञानी उडी घेतली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टयातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमीन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. पाटलांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.