चेंबूरमधील अमर महल सिग्नलजवळचा उड्डाणपूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. पुलाचे बोल्ट निखळल्यामुळे हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे चेंबूर परिसरात मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. दुरुस्ती अधिकाऱ्यांनी हा रस्ता लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
उत्तरेकडील मार्ग दहा दिवसात तर दक्षिणेकडील चार महीन्यात!
आता अखेर, या पुलाच्या उत्तरेकडील मार्ग म्हणजेच ठाणे आणि नाशिकला जोडणाऱ्या पुलाचे दुरुस्तीचे काम आटोक्यात आले असून ८ ते १० दिवसांत हा पूल सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुलाच्या उत्तरेकडील मार्ग जो सीएसटीच्या दिशेने जातो त्याचेही काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण होण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
नवी मुंबईला ठाणे आणि नासिकशी जोडमारा रस्ता
हा रस्ता नवी मुंबईला ठाणे आणि नाशिक रोडशी जोडतो. शिवाय पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जातो. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जेव्हा हा पूल बंद करण्यात आला होता, तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रस्ता चार महिन्यांत दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता तब्बल वर्षभरानंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
मेट्रो-४ चे कॉरीडोअरमुळे काम रखडले
त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. टी. पाटील यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, मेट्रो-४ चे कॉरीडोअर पुलाच्या वरून जाणार आहे. त्यामुळे, पुलासाठी केलेले फॅब्रिकेशन पुन्हा कार्यशाळेत नेण्यात आले आणि त्यावर पुन्हा काम करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेमध्ये दोन महिने गेले.
वाहतूक कोंडीस पर्याय म्हणून…
सध्या वडाला फ्रीवे, एससीएलआर, चेंबूर नाका, छेडा नगर, एलबीएस रोड, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. दहा दिवसांत हा मार्ग पुन्हा चालू झाल्यास मुंबईकरांना वाहतूकी कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.