घरपालघरखोडाळा परिसरात लावणी कामांचा खोळंबा; पावसाअभावी शेतकरी चिंतेत

खोडाळा परिसरात लावणी कामांचा खोळंबा; पावसाअभावी शेतकरी चिंतेत

Subscribe

पावसाचे माहेरघर असलेल्या जव्हार-मोखाडा तालुक्यातील ग्रामीण पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे.

पावसाचे माहेरघर असलेल्या जव्हार-मोखाडा तालुक्यातील ग्रामीण पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून खोडाळा परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.

दरवर्षीप्रमाणे जून महिन्याच्या उत्तर्धात भात, नागली व वरईच्या लावणीला सुरुवात करण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. परंतू, पाऊस योग्यवेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने माघार घेतल्यामुळे खोडाळा परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हांच्या तडाख्यामूळे करपू लागली आहेत. पावसाअभावी आवणांमध्ये चिखल होत नसल्याने आवणांच्या बांधावर मूठ बांधून ठेवण्याची वेळ बळीराज्यावर आली असून भात,वरई व नागलीची रोपे उन्हांमुळे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.

- Advertisement -

मोखाडा तालुक्यातील खोडाळासह पाथर्डी, बोटीशी, बेलपाडा, गोमघर, कुर्लोद, सूर्यमाळ, शेलमपाडा, वाशिंद, जोगलवाडी, वाकडपाडा, कारेगाव, कोचाळे, किनीस्ते, काष्टी, सावर्डे, करोळ, पाचघर, वाघ्याचीवडी, सायदे, सावरपाडा, हुंड्याचीवाडी,आडोशी या ग्रामीण भागात तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तो भातशेतीसाठी किंवा नागली वरईसाठी फायदेशीर नाही. पाऊस पडत नसल्याने खोडाळा परिसरातील शेतकरी आजही भात, नागली,वरईला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराज्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आतापर्यंत १0 टक्के सुद्धा पाऊस पडला नाही. मृग नक्षत्र संपले तरी या नक्षत्रात हवा असलेला पाऊस पडला नाही.

मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात,नागली व वरईचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात,नागलींच्या रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पाऊसाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस नसल्याने भात रोपांना खतेसुद्धा देत येत नसल्यामुळे खोडाळा परिसरात शेतकऱ्यांना खरिप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे.

- Advertisement -

पाऊस नसल्यामुळे भात लावणीचे काम खोळंबळे आहे. ज्या आवणांमध्ये पाणी होते त्यांची पीक रोवणी झाली आहे. मात्र, उन्हाच्या तडाख्याने आवणांतील पाणी अटल्यामूळे भात पिकांची आवणी खोळंबली आहे.
– देवराम कामडी, शेतकरी, वाघ्याची वाडी

तालुक्यातील भात, नागली व वरई या पिकांचे रोप तयार करून नंतर लावणी केली जात असल्यामुळे एकदा रोप खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते.त्यामुळे बळीराज्याला वर्षभराच्या पिकांवर पाणी सोडून द्यायची वेळ आली आहे. निसर्गाच्या पावसाने लहरीपणाचा साथ देत बळीराज्याबरोबर शेतीच्या नुकसानीचा खेळ खेळावयास घेतला आहे. मध्येच दोन दिवसाला सुरुवात होत नाही तोच पाऊस दडी मारून बसतो.यामुळे लावणीबरोबर इतर शेतीची कामेही रखडली आहेत. शेतकऱ्यांना मेघा पाणी दे अशी म्हणण्याची वेळ आली असून आद्रा नक्षत्रांच्या सरी तरी कोसळतील का असा प्रश्न पडला आहे. तर पावसाने दडी मारल्याने कामे रखडल्याने आता शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावर नाराजी व्यक्त करून पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे.

पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना होत आहे. पूर्वी वेळेवर पाऊस पडत असल्याने वेळेस पेरणी व लावणी झाल्यानंतर भाताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होते. परंतू, आता पावसाचा लहरीपणाचा सुरू असून ज्या वेळेस पावसाची आवश्यकता असते तेव्हा तो पडत नाही. ज्यावेळेस पाऊस नको असतो, त्यावेळेस पडतो. यामुळे दिवसेंदिवस भात उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.

हेही वाचा –

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण, एकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -