मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ७ ऑगस्टला एलपीजी टँकमधून मोठी गॅस गळती झाली. त्याप्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या अशा कस्तुरबा रुग्णालयात मागील शनिवारी एलपीजी टँकमधून मोठी गॅस गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली होती. त्यावेळी तेथील रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी आदींसह अग्निशमन दल यांनी सतर्कता दाखवली. त्यांनी तात्काळ २० कोरोना रुग्णांसह ५८ रुग्णांना नजीकच्या दुसऱ्या रुग्णालयीन इमारतीमधील कक्षात सुरक्षितपणे नेऊन दाखल केले.
भयभीत झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपत्कालीन परिस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे सदर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या रुग्णांचे प्राण वाचले. या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी (आज) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, या घटनेबाबत पालिका प्रशासनाने स्वतःहून निवेदनपर माहिती का दिली नाही? असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाला जाब विचारला.
तसेच या गंभीर घटनेबाबत तातडीने चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी रवी राजा यांनी केली. त्याची दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले. सदर दुर्घटनेचा तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत.