घरफिचर्सकवी, समीक्षक, विंदा करंदीकर

कवी, समीक्षक, विंदा करंदीकर

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले.

गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर’ हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदूर्ग याठिकाणी झाला. विंदांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. विंदांचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही.

विंदांच्या निर्मितीचा आवाका अत्यंत मोठा आहे. कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक आणि विचारवंत अशा विविध नात्यांनी त्यांची कामगिरी मौलिक स्वरूपाची आहे. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न, बहुश्रुत आणि अनेकविध संस्कारांनी संपन्न आहे. ‘परंपरे’चा स्वीकार करून ‘नवते’च्या दिशा शोधणे, हा करंदीकरांच्या जाणिवेचा स्वभाव आहे. विंदांच्या ‘स्वेदगंगा’ , ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आणि ‘अष्टदर्शने’ या सहा कवितासंग्रहांत मिळून साडेचारशेच्या आसपास कविता समाविष्ट आहेत. विंदांच्या प्रारंभीच्या अनेक कवितांवर मार्क्सवादाचा निश्चित स्वरूपाचा संस्कार झालेला आहे. ‘स्वेदगंगा’, ‘मुंबई’, ‘लोकशक्ति ही’, ‘विश्वरूप’, ‘मजूर’ इत्यादी कवितांमध्ये वक्तृत्वपूर्णता आहे. ‘माझ्या मना, बन दगड’, ‘ती जनता अमर आहे!’, ‘दातापासून दाताकडे’ या विंदांच्या प्रसिद्ध आणि परिणामकारक कविता आहेत. नंतरच्या काळात विचारप्रणालींच्या मर्यादा जाणवल्यावर (‘दंतकथा’सारखी कविता) समाजातील सामान्य माणसाविषयीची, उपेक्षितांविषयीची त्यांची आस्था आणि त्यांच्या चांगुलपणाविषयीचा त्यांचा विश्वास कधीही क्षीण झालेला दिसत नाही.
विंदांच्या कवितेतील प्रेमविषयक आणि स्त्रीविषयक जाणिवेच्या संदर्भात ‘रक्तसमाधि’, ‘त्रिवेणी’, ‘मुक्तीमधलें मोल हरवलें’, ‘सनातनी’, ‘संहिता’, ‘रूपक’, ‘दादरा’, ‘दीपचंदी’ ही तालचित्रे, ‘झपताल’, ‘भारतीय कविता’, ‘स्त्रियांसाठी स्थानगीत’ या कविता वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. ‘सरोज नवानगरवाली’, ‘बकी’, ‘मथूआत्ते’, ‘कावेरी डोंगरे’ ही व्यक्तिचित्रेही प्रत्ययकारी आहेत. विंदांच्या बालकवितांचे अकरा संग्रह आहेत. जीवनाकडे आणि काव्याकडे पाहण्याचा खुला, बहुतत्त्ववादी दृष्टिकोन हे विंदांचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ठ्य होते. मानवी जीवन हे कोणत्याही एका सिद्धान्ताच्या चिमट्यात पकडता येत नाही; प्रत्येक सिद्धान्तातील सत्यांश आणि मिथ्यांश उघड करीत जाणे हा जीवनातील गतिशील प्रवाहाचा स्वभावधर्म आहे अशी त्यांची धारणा होती.

- Advertisement -

देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. अशा या महान कवीचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -