घरफिचर्सइतिहासकार प्रबोधनकार ठाकरे

इतिहासकार प्रबोधनकार ठाकरे

Subscribe

अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी उपयोगात आणली. ग. भा. वैद्यांच्या ‘हिंदू मिशनरी सोसायटी’च्या कार्याला हातभार लावला.

केशव सीताराम ठाकरे हे ‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी कुलाबा जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. शिक्षण पनवेल व देवास येथे मॅट्रिकपर्यंत झाले. तथापि ज्ञानेच्छू वृत्तीने इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यांतील उत्तमोत्तम ग्रंथांचे स्वतंत्रपणे अध्ययन केले होते. पनवेल येथे असताना केरळ कोकिळकार कृ. ना. आठल्ये यांचा प्रेरक सहवास त्यांना लाभला. आठल्यांना ते आपले लेखन गुरू मानीत. ठाकरे यांचा स्वभाव महत्वाकांशी आणि हरहुन्नरी होता. त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. टंकलेखन, छायाचित्रकार, तैलचित्रकार, जाहिरातपटू, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही केले. तथापि, समाजसुधारणेच्या आणि समतेच्या तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारिता, तसेच प्रभावी वक्तृत्व व इतिहाससंशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ठ्ये होत. महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. राजर्षी शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने सहभागी झाले. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी उपयोगात आणली. ग. भा. वैद्यांच्या ‘हिंदू मिशनरी सोसायटी’च्या कार्याला हातभार लावला. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन या त्यांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावेही बोलकी आहेत. त्यांपैकी खर्‍या राष्ट्रोद्धारार्थ ‘सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट’ करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्यांचे नाव कायमचे निगडित राहिले. बहुजनसमाजोद्धाराच्या आंदोलनांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी भाग घेतला. त्यासाठी तुरुंगवास भोगला. अभिनिवेशयुक्त पण अत्यंत सडेतोड, ठाशीव आणि प्रखर विदारक भाषा हे त्यांच्या वाणीलेखणीचे वैशिष्ठ्य होते. कुमारिकांचे शाप ( १९१९), भिक्षुकशाहीचे बंड (१९२१) ही त्यांची सामाजसुधारणाविषयक उल्लेखनीय पुस्तके. खरा ब्राह्मण (१९३३), विधिनिषेध (१९३४) आणि टाकलेले पोर (१९३९) या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्त झालेला आहे.

मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता. सातार्‍याच्या प्रतापसिंह महाराजांच्या पदच्युतीचा, इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या अवहेलनेचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट लंडनपर्यंत गेलेला त्यांचा निष्ठावंत सेवक रंगो बापूजी ह्यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापुजी (१९४८) हा ग्रंथ लिहून महाराष्ट्रापुढे प्रथम त्यांनी मांडला. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास ( १९१९), हिंदवी स्वराज्याचा खून (१९२२), कोदंडाचा टणत्कार ( दुसरी आवृत्ती. १९२५) आणि रायगड (१९५१) ही त्यांची इतिहासविषयक अन्य पुस्तके. यांखेरीज संत रामदास, संत गाडगे महाराज व पंडिता रमाबाई यांची चरित्रे त्यांनी लिहिली. संत रामदासांचे चरित्र इंग्रजीत लिहिलेले आहे. मार्मिकमधून माझी जीवनगाथा (१९७३) हे आपले आत्मचरित्र प्रबोधनकारांनी लिहिले. जुन्या आठवणी (१९४८) या त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध संस्मरणिका होत. अशा या महान इतिहासकाराचे २० नोव्हेंबर १९७३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -