राजधानी दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस बिकट होतेय. दिवाळीत वाजवण्यात आलेल्या फटाक्यानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. यात सोमवारी कमी वेगाने वाहणारे वारे, कमी तापमान, उच्च आर्द्रता आणि वाहनांचे प्रदुषण अशा अनेक कारणांमुळे दक्षिण मुंबईतील म्हणजे कुलाबा या परिसरातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही वाईट झाल्याची माहिती वायू प्रदुषण तज्ञांनी दिली आहे. मुंबई शहाराच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कुलाबा या परिसरातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही बिकट होत आहे.
पुणेस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑलॉजीने विकसित केलेल्या हवेची गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली SAFAR नुसार, कुलाब्यामध्ये सोमवारी हवेची गुणवत्ता AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) ३४५ होती, तर यावेळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमाल ३३१ होती. परंतु काही दिवसांपूर्वी दिल्लीतील हवेची गुणवत्ता AQI ४७१ पर्यंत म्हणजे प्रदूषणाच्या विक्रमी पातळीपर्यंत नोंदवण्यात आली होती. हवा प्रदुषणाच्या या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे दिल्लीतील बहुतांश नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय.
परंतु द्वीपकल्पीय मुंबईतील समुद्रातून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई वायू प्रदूषणाच्या गंभीर परिणामांपासून वाचतेय. यावर रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसचे संस्थापक रोनक सुतारिया म्हणाले की, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करता, कुलाबा परिसरात वाढती वाहने आणि लहान जहाजांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळे मोठ्याप्रमाणात प्रदुषण वाढतेय. यामुळे माझगाव (३२५), बीकेसी (३१४) , मालाडमधील(३०६) हवेची गुणवत्ता सोमवारी अत्यंत वाईट पातळीवर पोहचली होती. अशा परिस्थितीत दिल्लीपाठोपाठ मुंबई देखील वायू प्रदुषणाच्या संकटात गुरफटताना दिसतेय. हवा प्रदुषणाच्या ३०१-४०० च्या AQI ला ‘अत्यंत वाईट’ रेट म्हटले जाते. या परिस्थितीच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यास श्वसनाचे आजार होऊ शकतात. तर २५९ क्रमांकावर अंधेरी हा परिसर हवा प्रदुषणाच्या ‘निकृष्ट दर्जा’ श्रेणीतील परिसर आहे. चेंबूर देखील या श्रेणींमध्ये दिसले, परंतु येथील हवेची गुणवत्ता सोमवारी ‘मध्यम’ मर्यादेत राहिली. मध्यम AQI पातळी (१०१-२००) दरम्यान असते.
माझगावपर्यंतच्या पूर्व किनार्यांवर मालवाहू, समुद्र पर्यटनासाठी जहाजे, बोटी, कॅटामॅरन्स आणि मच्छिमारीची वाहतूक रात्रंदिवस सुरु असते. यामुळे दक्षिण मुंबईत वायू प्रदुषणाची समस्या मोठं संकट ठरतेय. यावर सफरचे संस्थापक आणि प्रकल्प संचालक डॉ. गुफ्रान बेग यांनी सांगितले की, कमी तापमान, कमी वाऱ्याचा वेग आणि उच्च आर्द्रता यासारख्या नैसर्गिक घटकांमुळे कुलाब्यातील हवेमध्ये अधिक कणिक पदार्थ आढळून येता आहेत. परिणामी त्यांची पातळी दिवसेंदिवस वाढतेय. दरवर्षी कुलाबा परिसरात ही स्थिती निर्माण होतेय. बीकेसी, अंधेरी, मुलुंड आणि घाटकोपर शहरातही वाहनांच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे, तर चेंबूरमध्ये देवनार इन्सिनरेटर, तेल, वायू आणि केमिकल रिफायनरी व्यतिरिक्त पॉवर स्टेशनमधून अनेक वायू उत्सर्जन होत असल्याने तेथील परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होतेय.