राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. तसेच हे सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता गंभीर वळणावर पोहोचले असून महाराष्ट्राच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडावं, अशा प्रकारचं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर येऊन पोहोचले
महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे आता हे आरोप-प्रत्यारोप फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप राहिले नसून अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.
काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव पाठवला
अँटिलीया प्रकरण आणि शंभर कोटी रूपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं. तसेच महापालिका निवडणुकींसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आघाडी करण्याचा हा प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा असून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाकडे दिलाय. मात्र, एक महिना उलटूनही काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, असं आंबेडकर म्हणाले होते.