राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन नाकारला असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत सुनावण्यात आलेल्या ईडी कोठडीत आता ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिकांची आज ईडीकडून पुन्हा एकदा कोठडी मागण्यात आली होती. त्यानंतर यावर युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने ७ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी दिली आहे.
मागील आठ दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक केली होती. तसेच त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु न्यायालयात मलिकांना आज हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिकांनी ५५ लाख हसीन पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने न्यायालयात त्यांची चूक कबूल केली असून मलिकांनी ५ लाख दिल्याचे म्हटले आहे. आमच्या टायपिंगंमध्ये चूक झाल्याचं ईडीने म्हटल्याचं एएसजी अनिल सिंह यांनी सांगितलं. मात्र, २५ ते २८ फेब्रुवारी अशा चार दिवसांच्या कालावधीसाठी मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे मलिकांची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिकांना संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. नवाब मलिकांच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांना देखील ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर आणि अन्य काही व्यक्तींची चौकशी केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती.
हेही वाचा : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय