घरताज्या घडामोडीस्वप्ननगरी मुंबईला 'वृक्ष नगरी'चा जागतिक सन्मान

स्वप्ननगरी मुंबईला ‘वृक्ष नगरी’चा जागतिक सन्मान

Subscribe

अथांग समुद्र किनारपट्टी, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, फिल्मी नगरी, अभिनेते, साहित्यिक, हेरिटेज वास्तू आदींनी गजबजलेली आणि देश, विदेशातील तरुणांना आणि पर्यटकांना भुरळ घालणारी स्वप्ननगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा या मुंबई शहरातील पर्यावरणाची दखल जागतिक स्तरावरील संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे.
या संस्थेने ‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘Tree City’चा ‘वर्ष २०२१’ साठीचा बहुमान मुंबई शहराला घोषित केला आहे.

हा एवढा मोठा जागतिक सन्मान मिळवणारे मुंबई शहर हे भारतातील दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे ‘स्वप्न नगरी’ अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता ‘वृक्ष नगरी’ अशी एक नवीन ओळख मिळाली आहे. यापूर्वी असा सन्मान मिळविणारे ‘हैद्राबाद’ हे शहर पहिले शहर होते. त्यानंतर मुंबईने हा जागतिक सन्मान मिळवला असून राज्याचे पर्यावरण आणि पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे आणि वृक्ष प्राधिकरणाचे विशेष कौतुक केले आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरणप्रेमी उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल चहल आणि महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी मुंबईत कोस्टल रोड, राणी बाग विस्तार, नद्या, नाले, रस्ते यांचा विस्तार आदी विकासकामे घडत असतानाच पर्यावरणाचा समतोल साधण्याची मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आज इमारत बांधकामे, विकासकामे करताना झाडांचे बळी देण्याऐवजी पालिका उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण समिती यांनी त्या झाडांना पुनररोपित करून वाचविण्याचा व जगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा सन्मान मुंबईला मिळण्यात मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालिका आयुक्त, उद्यान विभाग यांचा मोलाचा वाटा आहे.

सोमवारी महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीदरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली आणि मुंबई महापालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुक केले. यावेळी, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त मिलिन सावंत, उपायुक्त संजोग कबरे आणि अजय राठोर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील ‘अरबर डे फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे. तसेच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक ‘नेटवर्क’मध्ये सहभागी झाले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्जा मिळवल्याबद्दल त्यांनी मुंबई शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.

पालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, ‘मुंबई महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे.’

मुंबईत सध्या ३० लाख झाडे

मुंबईत सध्या सरकारी, पालिका, इतर प्राधिकरण व खासगी हद्दीत मिळून विविध प्रकारची एकूण ३० लाख झाडे अस्तित्वात आहेत. त्यापैकी १ लाख ८० हजार झाडे ही रस्त्यालगत आहेत. तसेच, मियावाकी पद्धतीने लावण्यात आलेली ४ लाख झाडे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणी बाग, आरे कॉलनी आदी परिसरात हजारोंच्या संख्येने झाडे आहेत. राणी बागेत तर ५०० वर्षे जुने झाड, दुर्मिळ औषधी झाडे आहेत.


हेही वाचा – Mumbai Bank : प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा दिलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -