काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘मोदी फोबिया’ झालाय. म्हणून ते सतत मोदी, मोदीचा जप त्यांच्या भाषणामधून करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवणे हे राहुल गांधी आणि काँग्रेसचे लक्ष्य आहे. पण, देशातून गरीबी, बेरोजगारी आणि निरक्षरता हटवणे हे आमचे लक्ष्य आहे असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मध्यप्रदेशातील नरसिंहपूरमधील सभेत बोलत असताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जबरदस्त प्रहार केले. राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भीती वाटत आहे अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली. मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून सध्या प्रचाराला जोर चढला आहे. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
Rahul has developed Modi phobia. He keeps on saying Modi, Modi in his speeches. Rahul wants to remove Modi, while we want to remove poverty, unemployment and illiteracy from the country: BJP President Amit Shah in Narsinghpur. #MadhyaPradesh pic.twitter.com/QH4AkgW2Kl
— ANI (@ANI) 19 November 2018
राफेल करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला केला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबांनींचा ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. शिवाय, बेरोजगारी, गरीबी यावरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण राहुल गांधी यांनी चालवले आहेत. तसेच चौकीदार नाही तर देशका चौकीदार चोर है हा हॅशटॅग देखील सध्या काँग्रेसकडून ट्विटरकडून वापरला जात आहे. या सर्व आरोपांना यावेळी अमित शाह यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्ला केला होता. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. त्याला आता राहुल गांधींना ‘मोदी फोबिया झालाय’ अशा शब्दात अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याला आता राहुल गांधी नेमकं काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.