महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो याशब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया’, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
“उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणे देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
“आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे”, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
“राज्याच्या विकासाचं मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुंबईसह राज्यभरात उद्यापासून म्हणजेच बुधवार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणरायाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे.
हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी उपमुख्यमंत्र्यांसह 64 नेत्यांचा राजीनामा