घरफिचर्ससारांशदी रियल स्टोरी ऑफ ‘लिटमस वडापाव’!

दी रियल स्टोरी ऑफ ‘लिटमस वडापाव’!

Subscribe

‘ब्लॅक होल्स’सारखेच मानवी मनाचे विज्ञानाचे आकलन हे पुस्तकाबाहेरचे तंत्रज्ञान होय. ‘फ्लॅश बॅक’च्या खर्‍याखुर्‍या आठवणी ह्या कुणाला कदाचित स्वप्नवत वाटू शकतील. दिल्ली ते गल्ली आजही ‘ओन्ली सोल्यूशन्स’ म्हणत ‘नेशन फर्स्ट’च्या मोहिमेत ‘वडापाव’ खरोखर उपयोगी ठरत आहे ही मोठी गंमत वाटते. ‘लिटमस’ हादेखील संशोधनाचा विषय होऊ शकतो. संशोधक हे केवळ प्रयोगशाळेत जन्माला येत नाहीत तर ते स्वयंपाकघरातदेखील असतात. दादर-मुंबई येथील कमलाबाई यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पाहुणे घरी आले म्हणून स्वयंपाक करताना बटाट्याची सुकी भाजी बेसणाच्या पिठात टाकून शेंगदाणा तेलात सोडली आणि एका खमंग पदार्थाचा शोध त्यांना लागला.

कृष्णविवर (ब्लॅक होल) विषयीच्या शोधाबद्दल दोन वर्षांपूर्वी भौतिकशास्त्राचे नोबल प्राईज न्यूयॉर्क शहरात जन्मलेल्या आणि लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या आंद्रिया गेझ या महिलेला मिळाले होते. १९०१ ते २०२० पर्यंत किमान ५८ महिलांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. यात नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली महिला मेरी (स्क्लोदोस्का) क्यूरीने तर भौतिकशास्त्र (१९०३) व रसायनशास्त्र (१९११) अशी दोनदा बाजी मारली आहे. क्यूरीची मुलगी, इरिन जलियट-क्यूरी (१९३५) यांनी रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकले आणि या दोन्ही एकमेव आई-मुली जोडीला नोबेल पारितोषिक जिंकले. मारिया गोपर्ट मेयर (१९६३) यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. नोबेल पारितोषिक मिळणार्‍या सर्वात अलिकडील महिलांमध्ये अर्थशास्त्रातील एस्थर डुफलो (२०१९), भौतिकशास्त्रातील डोना स्ट्रिकलँड, रसायनशास्त्रातील फ्रान्सिस अर्नोल्ड, पीस फॉर पीस, नादिया मुराड फॉर पीस आणि साहित्यातील ओल्गा टोकर्सझुक यांचा समावेश आहे (२०१८).

वडापाव संशोधनच!

- Advertisement -

संशोधकांची यादी कशासाठी असा प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविक आहे, पण संशोधक हे केवळ प्रयोगशाळेत जन्माला येत नाहीत तर ते स्वयंपाकघरातदेखील असतात. खरंतर वडापाव हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
दादर-मुंबई येथील कमलाबाई यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पाहुणे घरी आले म्हणून स्वयंपाक करताना बटाट्याची सुकी भाजी बेसणाच्या पिठात टाकून शेंगदाणा तेलात सोडली आणि एका खमंग पदार्थाचा शोध त्यांना लागला. पाहुणे तर याच्या प्रेमात पडले आणि सोशल मीडिया नसतानादेखील सोशल असणार्‍या माणसांची माऊथ पब्लिसिटी हीच त्यांची ओळख झाली. ‘वडा’ खरेदीसाठी रांगा लागायला सुरुवात झाली. पुढे याच्या जोडीला पाव आला आणि वडापाव झाला. कमलाबाईंनी या एका वेगळ्याच पदार्थाचे पेटंट घेतले असते तर काय झाले असते याची कल्पना तुम्ही करू शकताच.
आज वडापाव हा पोटाची खळगी भरत भूक भागवण्याचा स्वस्त आणि मस्त उपाय होय. मुंबईकर, पुणेकर, नाशिककरच नव्हे तर हा वडापाव गावागावात आणि साता समुद्रापार पोहचलाय. अनलॉक होत असताना सर्वाधिक गर्दी होत आहे ते वडापाव घेण्यासाठी. १९६५ साली कमलाबाईंनी वडा तयार केल्यानंतर ५० वर्षांनी म्हणजे ही घटना आहे २०१५ सालची.

मैत्रीचे विज्ञान तंत्र!

- Advertisement -

पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एमबीएचे लेक्चर केल्यानंतर कॅन्टीनमध्ये नित्यनियमाने वडापावचा आस्वाद घेताना अनेक नवीन मित्र जोडले गेले. पुण्यातील हडपसरच्या एका नामांकित कंपनीत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजर हा अनुभव गाठीशी होता. मित्र म्हटले की मैत्रीचे वेगळे विज्ञान व तंत्र असते. शब्दापलीकडल्या या मंत्रात हक्काने काम सांगणे हा वेगळा ओलावा असतो. एका मित्राने मला त्याचा पत्ता दिला आणि दुसर्‍या दिवशी भेटायला बोलावले.

ओन्ली सोल्यूशन!

कंपनीत पोहचलो तेव्हा बायोडाटा छाननी, शैक्षणिक योग्यता म्हणजे टक्केवारी, रिटन टेस्ट, अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट, लँग्वेज टेस्ट, पर्सनल इंटरव्यू, पॅनल इंटरव्यू, ग्रुप डिस्कशन असे कितीतरी टप्पे पार करीत मित्राच्या कंपनीमध्ये चार तरुणांची निवड जवळपास निश्चित झाली होती. त्यांना नेमके कोणते काम द्यावे, किती पगार द्यावा यावर त्याचा निर्णय मात्र होत नव्हता. मनुष्यबळाला सुयोग्य दिशा देण्यासाठी कंपनीत ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट होते. तरीही कंपनीत बोलावून माझ्यावर त्या मित्राने एक जबाबदारी सोपवली. ‘ओन्ली सोल्यूशन!’ हे जीवनाचे ब्रीद आहे ना मग मला सपोर्ट कर मित्रा! असे म्हटल्यावर नाही कसे म्हणणार? म्हटली तर छोटीशीच जबाबदारी, पण मित्राला वाटणारी ती मोठीशी!

दी जजमेंट डे!

‘दी जजमेंट डे’ आलाच! मित्राला वाटत होतं की हे काम मैत्रीखातर मी करावे. म्हणूनच त्याने मला बोलावले. ठरल्याप्रमाणे मी वेळेत गेलो. सकाळी अकरा वाजल्यापासून चार तरुण स्त्री पुरुष उमेदवार त्याच्या केबिनबाहेर बसलेले होते. आपल्या केबिनमधून तो त्या उमेदवारांचे निरीक्षण करीत होता. मित्राला एका ‘अनबायस्ड डिसिजन सपोर्ट सिस्टम’ची गरज होती. या चौघांचा पगार आणि डिपार्टमेंट ठरवण्याची जबाबदारी आता तुझी आहे असे म्हणत कपाटातून एक नवा कोरा कोट काढून त्याने मला दिला.

जीएम!
पुढच्या एक तासासाठी तू या कंपनीचा जनरल मॅनेजर (जीएम)! म्हणत त्याने स्वतःची खुर्ची रिकामी केली आणि केबिनमधून शांतपणे बाहेर निघून गेला ते बुटांचा आवाज करत…
अनिल कपूरच्या ‘नायक : द रियल हिरो’ (२००१) चित्रपटामधील एक दिवसाचा मुख्यमंत्रीप्रमाणे मी आता एका कंपनीचा एक तासाचा जनरल मॅनेजर झालो होतो. माझ्यासाठी विस्मयकारक-धक्कादायक आणि आव्हानात्मक असा हा अनुभव होता.

१. कोटरूपी ‘अंगरखा’ चढवत जनरल मॅनेजरच्या खुर्चीवर बसल्यानंतर मी सर्वप्रथम डोळे बंद करून रिलॅक्स झालो. तेव्हा घड्याळाने बरोबर एकचा टोल दिल्याचे मी ऐकले. मी इथे कशासाठी बसलो आहे, जीवनाच्या प्रवासात विविध टप्पे येत-जात असतात आणि प्रवासात कायम कुणी खुर्चीला आयुष्यभर चिटकून राहू शकत नाही या विचाराने मिळालेली खुर्ची ही किती काळासाठी आहे हा प्रश्न गौण झाला!

आता काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे हा प्रश्न मी स्वतःला विचारला. एचआरडी मिनिस्ट्री अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रिपल आयटी) अलाहाबाद या डिम्ड युनिव्हर्सिटीला असतानाचा अनुभव विजेसारखा डोळ्यासमोरून सरकला. आज इंडियाटुडेनुसार २०१९ मध्ये ट्रिपल आयटी अलाहाबाद हे भारतातील सर्वोत्कृष्ट शासकीय इंजिनिअरींग कॉलेजच्या रँकींगमध्ये १० व्या क्रमांकावर आणि जागतिक विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये ११९ व्या क्रमांकावर आहे.

खुल जा सिम सिम!

ेत्या दिवशी पुढील तीन तासात घरी जाऊन रेल्वे स्टेशनवरुन जन्मगावी नाशिकला येण्यासाठी रेल्वे पकडायची होती आणि त्याचवेळी अचानक मला सांगितले गेले की बीटेक (आयटी) फर्स्ट सेमिस्टरची मीच डिझाईन केलेली इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर फॅब्रिकेशन अ‍ॅड फन्डामेंटलची लॅब तिसर्‍या मजल्यावरून मला तळमजल्यावर हलवून पुन्हा वापरण्यायोग्य स्थितीत मी नसतानाही कार्यान्वित करायचीच आहे. नेहरू सायन्स सेंटरमधील हा तिसरा मजला अलाहाबाद विद्यापीठाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला होता. इतरांनी नकार दिल्याने ही जबाबदारी मला देण्यात आली होती.

दिल्ली येथील विज्ञान भवनला एका महत्वाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर आवाजाने जळणारे तेलाचे दिवे पेटविण्यासाठीच्या प्रयोगाचे सादरीकरण उद्घाटनप्रसंगी दूरदर्शनवरुन लाईव्ह प्रक्षेपित झाले. त्यात यशस्वीरीत्या बनविलेल्या ह्या ‘व्हॉईस कंट्रोल सिस्टम’वर त्यावेळी ‘इनोव्हेटिव्ह सपोर्ट सेंटर’ मध्ये मी काम करीत बसलो होतो. ‘अब करो खुल जा सिम सिम! दिखाओ अपना जादू या मानलो हार!’, माझा सहकारी रामकिशोर अग्रवाल मला म्हणाला होता. पहिल्या सेमिस्टरच्या १२० विद्यार्थ्यांच्या बॅचच्या काही निवडक तरुणांना मी वर्गातून बाहेर काढले. प्रॉब्लेमवर सोल्यूशन आपल्याला काढायचे एवढेच सांगितले. मानवी ’मुंग्यां’ची रांग बनली आणि अवघ्या ३० मिनिटात काम फत्ते! ही आणि अशा बर्‍याच गोष्टी त्यावेळी विशेष कर्तव्यावर अधिकारी (ओएसडी) डॉ. एम. डी. तिवारी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) के भूतपूर्व अध्यक्ष डॉ. एम. जी. के. मेनन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी आदी प्रवास करीत एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती.

फ्लॅशबॅक!

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जेव्हा ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये आले तेव्हा त्यांनी मी केलेले प्रयोग आणि बदल सोबत फिरुन पाहिले. ४५ मिनिटांच्या संवादानंतर अतिशय प्रेमळपणे मृदू आवाजात सर्व विद्यार्थ्यांसमोर माझी पाठ थोपटली व भाषणातदेखील माझा पूर्ण नावानिशी उल्लेख केला होता. देशभरातून आयआयटी लेवलचे क्रीम विद्यार्थ्यांना त्यांनी एक शिक्षक राष्ट्र निर्माण करण्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे सांगितले. ‘ओन्ली नॉलेज विथ इट्स अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅड विल पावर कॅन मेक इंडिया सूपर पॉवर! अ‍ॅन्ड द नेक्स्ट वॉर विल बी ओन्ली विथ नॉलेज अ‍ॅन्ड नॉन विथ मसल ऑर मनी!’ असे माझ्या खांद्यावर हात ठेवत एपीजे म्हणाले होते. पुढे ‘प्रज्ञानम् ब्रम्ह’ हेच ब्रीद घेऊन मी ट्रिपल आयटी अलाहाबादचा लोगो डिझाईन केला. मला रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणि हा लोगो आजही ट्रिपल आयटी अलाहाबादची जागतिक ओळख बनत वापरला जातो आहे. भारताची भावी हायटेक जनरेशन म्हणजे विद्यार्थी, मी आणि एपीजे असे एकत्र कितीतरी क्लिक झालेले फोटो आज ही ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये आहेत. भूतकाळाच्या फोटोंच्या प्रकाशातून बाहेर पडत आठवणीतील ‘फ्लॅशबॅक’ संपत नव्या वर्तमानाची जाणीव मला झाली. डोळे उघडले तेव्हा पुढचा विचार होता तो फक्त प्रामाणिकपणे ही नवी जबाबदारी पार पाडण्याचा!

२. पुढच्या क्षणी चौघांना एकत्रित आपापल्या फाईल घेऊन केबिनमध्ये मी बोलावले. फाईल न पाहता त्यांना त्या बाहेर ठेवण्यास सांगितले. प्रश्नार्थक चेहर्‍याने कोणीच काही न बोलता चौघेजण फाईल बाहेर ठेवून केबिनमध्ये पुन्हा हजर झाले.

३. त्यानंतर मी खिशातून दहा रूपयांच्या चार कोर्‍या करकरीत नोटा काढून टेबलावर ठेवल्यात. कोणीही एकमेकांशी न बोलता ३० मिनिटात प्रत्येकाने एक वडापाव आणून थेट माझ्या केबिनमध्ये टेबलवर ठेवून पुन्हा बाहेर वेटिंगरूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे. आणि जाताना फोन, बॅग रिसेप्शन काऊंटरवर लॉकरमध्ये जमा करून फक्त चावी सोबत घेऊन वेगवेगळ्या दिशेला परस्परांशी न बोलता जायचे असे नियम सांगितले.

४. कोणीही काहीही न विचारता प्रश्नार्थक नजरेने वडापाव आणण्यासाठी सर्व निघून गेले.

५. बरोबर वीस मिनिटात पहिल्या उमेदवार आला. टेबलावर माझ्यापुढे बरोबर दहा रुपयाला मिळणारा वडापाव आणि दोन पूर्ण तळलेल्या मिरच्या समोर ठेवत काही न बोलता तो बाहेर निघून गेला.

६. दुसरा उमेदवार हसत त्यानंतर पाच मिनिटांनी केबिनमध्ये आला. स्वतःच्या खिशातले पाच रुपये टाकून एक पंधरा रुपयाचा वडापाव, चार मिरच्या आणि केशरी रंगाची चटणीची कागदी प्लेट टेबलावर ठेवून गेला.

७. तिसर्‍या उमेदवाराने वडापाव आणि भज्यांचे दोन पॅकेट सोबत आणले होते. त्याने एक प्लेट भजी आणि वडापाव या दोघांच्या मध्ये ठेवली आणि भज्याचे एक पाकीट घेऊन तो केबिनच्या बाहेर जाऊन बसला.

८. चौथा उमेदवार अर्धा तास होऊनदेखील अद्याप परतला नव्हता. साधारणपणे ४५ मिनिटांनी त्याने केबिनमध्ये येऊन दहा रुपयाची नोट व त्याचबरोबर घडी करून आणलेला एक कागदही ठेवला. कदाचित, आपल्या कृतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी तो काही तरी बोलणार होता. पण त्याने स्वत:ला आवरले आणि तोही काहीच न बोलता बाहेर जाऊन बसला.

९. पाच मिनिटानंतर चौघांना एकत्र केबिनमध्ये बोलावले. आणि ६० सेकंदात आपला अनुभव सांगायला सांगितला. अनुभव सांगून झाल्यानंतर ते केबिनमधून परत वेटिंग रूममध्ये गेले.

१०. बरोबर १.५९ वाजता बरोबर माझा मित्र केबिनमध्ये आला. प्रिंट काढलेले कागद मी त्याच्याकडे सुपूर्त केले. त्याने त्यावर नजर फिरविली. घड्याळाने दोन टोल दिले. मी उठून ‘अंगरखा’ काढला. कोट आता खुर्चीला चढविला होता.

११. मित्र आता पुन्हा जरनल मॅनेजरच्या खुर्चीवर बसला. एकही प्रश्न न विचारता त्याने खिशातून चकाकणारे सोनेरी पेन काढले. सह्या करत चौघा उमेदवारांच्या चैतन्यमयी जीवनाच्या ‘परवान्या’वर आणि माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.

१२. आम्ही दोघे केबीनमधून बाहेर आलो. यावेळी मित्राने स्वत:चा कोटदेखील केबिनमध्ये काढून ठेवला होता.

१३. चौघांना ‘लेटर’ देण्याचा मान मित्राने मला दिला. ड्युटी (कर्तव्य), रेस्पॉसिंबिलिटी (जबाबदारी), अकाऊंटीबिलिटी (उत्तरदायीत्व), चेकलिस्ट ते पूर्ण करण्याची डेडलाईन, दररोजच्या कामाचा तपशील आणि फिडबॅक सिस्टमची माहिती, प्रक्रियाचे पहिले पान होते आणि त्या खाली अपॉईंटमेंट लेटर होते.

१४. उत्साही व वेळेत काम करणार्‍या, आज्ञाधारक आणि काहीशा सांगकाम्या यांच्या मधल्या अवस्थेतील उमेदवाराला क्लेरिकल विंग, दुसर्‍याला खूश ठेवण्यासाठी व्ह्यॅल्यू अ‍ॅडिशन करणारा, प्रसंगी स्वतःच्या खिशाला झळा देणारा बोलक्या स्वभावाचा दुसरा उमेदवार पब्लिक रिलेशन आणि मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये होता.

१५. तिसरा उमेदवार केबिनमधून बाहेर गेला तेव्हा तो चौथा उमेदवार येण्याची वाट बघत थांबला होता. मधल्या पाच मिनिटांच्या कालावधीत त्याने सर्वांना आपल्या मोठ्या पाकिटातून भज्याची चार पाकिटे बाहेर काढून हातात देताना तसेच आधार देतानाचे दृश्य ‘कॅमेरा’ टिपत होता. तो आयटी प्रोजेक्ट टीम लीडर झाला होता.

१६. चौथा उमेदवार प्रामाणिक होता. नोट परत करताना वड्यासाठी वापरले जाणारे तेल कसे खराब आहे आणि वडा खाऊन आरोग्याला त्रास होऊ शकतो हे मोजक्या शब्दात कागदावर लिहीत चांगले वडे आणण्यासाठी अजून वेळ त्याने मागितला होता. रिस्क होती तरी गुणवत्तेशी तडजोड करायला तयार नव्हता. शोधवृत्ती पाहता रिसर्च, डेव्हलपमेंट अँड क्वालिटी कंट्रोल आणि सिस्टम इम्प्रुव्हमेंट! अशी जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली. कंपनीच्या ध्येयधोरणांची गुणवत्ता राखण्यासाठी धडपडणारा उमेदवार गमावणे म्हणजे कंपनीचे नुकसान होते.

हास्य आणि ढगफुटी!

१७. एव्हाना वडापाव, भजी, कंपनीचा चहा-नाश्ता समोर आला. वातावरण आल्हाददायक होते. एसीचा गारवा भर उन्हातदेखील जाणवत होता. पण मिरच्या न खाताच चारही उमेदवारांच्या डोळ्यातून ‘ढगफुटी’ झाली होती. सुयोग्य व अपेक्षेपेक्षा जास्त पगार मिळण्याचा आनंद उमेदवारांच्या डोळ्यात होता. सोबत मोकळ्या आकाशाला गवसणी घालण्याची अमर्याद संधी ही तरुण पंखांना मिळाली होती.
१८. चारही सेनापती आपल्या मोहिमेला गेले तेव्हा मधल्या वेळात अपॉईंटमेंट लेटर बनविण्याचे काम संपवून मी वेटिंग रूममध्ये चक्कर मारत होतो. मी बाहेर पडलो तेव्हा ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये माझ्या प्रत्येक वर्गात आणि लॅबमध्ये लावली होती अगदी हुबेहुब तशीच पाटी आता भिंतीवर ‘खुलली’ होती – हास्य आणि हसण्यावर बंदी नाही!

लिटमस

स्पॅनिश फिजिशियन अर्नाल्डस डी व्हिला नोव्हा यांनी सुमारे १३०० मध्ये प्रथमच लिटमसचा वापर केला. लिटमसचा मुख्य उपयोग म्हणजे एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी हे तपासणे होय. भौतिकशास्त्राचे आणि एरोडायनॅमिक्सचे नियम वापरत पुढच्या मिनिटातच शंभर नव्हे तर एक हजार टक्के अचूक हवामानाची माहिती देणे आज जगभर शक्य आहे. मात्र ‘ब्लॅक होल’ पेक्षाही गुढ, मनाचा थांग गाठत, मानवी भाव-भावना, इगो, कॅरेक्टर, बिहेवियर, लॉयल्टी आदींसाठी अशा पुस्तकात नाही. मी घेतलेल्या अशा ‘टेस्ट’ योग्य आहे की नाही याबद्दल मते-मतांतरे असू शकतील. सर्वत्र सरधोपटपणे वापरता येईल असे तर मुळीच नाही हेदेखील महत्वाचे! मात्र स्वप्नवत वाटावा असा हा खराखुरा स्वानुभव म्हणजे जस्ट एक सॅम्पल – दी रियल स्टोरी ऑफ ‘लिटमस वडापाव’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -