घरमुंबईडबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास

डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार, वंदे भारत एक्स्प्रेसचा मोदींच्या हस्ते शुभारंभ

केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे. नजीकच्या काळात डबल इंजिनमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केला. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात प्रथमच पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ महाराष्ट्रालादेखील होणार आहे.वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रे आपल्या धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचे लोकार्पणही मोदी यांनी केले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. आज राष्ट्राला नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना अत्यंत आनंद होत आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मोदी पुढे म्हणाले की, आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक दळणवळण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदाच एकाच वेळी दोन वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत. या वंदे भारत गाड्या मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानाशी जोडणार आहेत. या गाड्या महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला मोठी चालना देतील. या गाड्यांमुळे शिर्डीत साईबाबांचे दर्शन, नाशिकचे रामकुंड, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला जाण्यासाठी नवी वंदे भारत गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे.

त्याचप्रमाणे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ किंवा आई तुळजा भवानीचे दर्शन खूप सुलभ होणार आहे. ही वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताची अतिशय रुबाबदार प्रतिमा आहे. ही भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हींचे प्रतिबिंब आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईतील जनतेचे जीवन अधिक सुलभ करणारे प्रकल्पदेखील येथे सुरू झाले आहेत. हे पाहून मला आनंद होत आहे. आज ज्या उन्नत मार्गिकेचे उद्घाटन होत आहे तो मुंबईच्या पूर्व-पश्चिम भाग जोडणीची गरज पूर्ण करेल. मुंबईतील लोक बर्‍याच काळापासून या सुविधेच्या प्रतीक्षेत होते. दररोज दोन लाखांहून अधिक गाड्या या मार्गिकेचा वापर करून प्रवास करू शकणार आहेत. यामुळे लोकांच्या वेळेचीदेखील बचत होणार आहे. आता या मार्गिकेमुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील उपनगरी भाग एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे जोडले जाणार आहेत. कुरार येथील अंडरपासदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असेही मोदी म्हणाले.

२१ व्या शतकातील भारतासाठी नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुलभ करणार्‍या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सुधारणांच्या गरजेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. आधुनिक गाड्या, मेट्रोचा विस्तार तसेच नवीन विमानतळ आणि बंदरे सुरू करण्यामागे हीच विचारसरणी आहे, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीला अर्थसंकल्पाने बळ दिले आहे. कारण पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून यात रेल्वेचा वाटा अडीच लाख कोटी रुपयांचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पातही भरीव वाढ केली असून दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा वेगाने पुढे जाईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरीव निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमचे युती सरकार ७ महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही मिळाला नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, असे सांगून शिंदे म्हणाले की, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. पंतप्रधानांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल.

सिंचन, रस्ते प्रकल्प, गृहनिर्माण, कृषी, स्टार्टअप अशा सर्व क्षेत्रांत राज्याला या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप काही मिळाले आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे, त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान मोदींचे नाव इतिहासात कोंदले जाईल : फडणवीस

वंदे भारत ट्रेन हे एक आश्चर्यच आहे. कोणी कल्पनाही केली नसेल की भारतात अशा प्रकारच्या रेल्वेगाड्या बनवल्या जाऊ शकतात आणि चालवल्या जाऊ शकतात. रेल्वेच्या सुरुवातीला नाना शंकरशेठ यांनी मुंबईतील रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी भूमिका बजावली होती. त्यांचे हे योगदान कोणाला विसरता येणार नाही. त्याप्रमाणे भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात कोरले जाईल, असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
– मुंबई-सोलापूर वंदे भारत
-मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत
-सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड
-कुरार बोगदा

मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व
वंदे भारतच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधेरी मरोळ येथील अलजमिया-तुस-सफीया या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -