घरदेश-विदेशपुलवामामध्ये RDX आले कसे? मोदींनी उत्तर द्यावे - असदुद्दीन ओवैसी

पुलवामामध्ये RDX आले कसे? मोदींनी उत्तर द्यावे – असदुद्दीन ओवैसी

Subscribe

पुलवामा येथे झालेला हल्ला हा पाकिस्तानने केलेला असून या हल्ल्याला पुर्णपणे तेच जबाबदार आहेत, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत केली. ते म्हणाले की, जेव्हा देशाचा प्रश्न येणार तेव्हा तेव्हा मतभेद विसरून आम्ही सर्व एकत्र येऊ. तसेच आता मोदींनी आपल्या चेहऱ्यावरून सभ्यतेचा मुखवटा बाजुला करावा आणि पाकिस्तानला उत्तर द्यावे. आम्हाला ट्रम्पचा आणि इम्रान खानचा विश्वास नाही. तर भारताने आपल्या बळावरच कारवाई करावी, अशी भावना ओवैसी यांनी व्यक्त केली आहे.

ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “पाकिस्तानकडे पैसे नाहीत. सौदि अरेबियाकडून यांना भीक मिळाली, म्हणून त्यांचा आठ दिवस जेवणाचा प्रश्न सुटला आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. इम्रान खानला आम्ही सांगू इच्छितो. मोहम्मद अली जिना मुंबईचे होते. तरी त्यांच्यासोबत आम्ही पाकिस्तानात गेलो नाही. जिना मुंबई सोडून गेले आम्ही मात्र इथेच राहिलो. देशाचा प्रश्न येईल तेव्हा भारतातला मुस्लिम समाज देशाच्यापाठी ठामपणे उभा राहिल.”

- Advertisement -

भारताने हल्ला केला तर पाकिस्तानच्या एकाही मंदिरात घंटा वाजणार नाही, अशी धमकी एका पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने दिली होती. याचाही समाचार ओवैसी यांनी घेतला. ते म्हणाले की, मंदिराचा घंटानाद रोखण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की जोपर्यंत हिंदुस्तान आहे. तोपर्यंत मस्जिद, मंदिर, गुरुद्वारातून आवाज येतच राहणार. पाकिस्तान संपेल मात्र हिंदुस्तानचा हा आवाज बंद होणार नाही.”

पुलवामा हल्ल्याची मोदींनी चौकशी करावी आणि देशाला सत्य सांगावे

“मोदीजी पुलवामामध्ये ३०० किलो आरडीएक्स कसे आले याचा विचार करा? पाकिस्तानच्या धमक्यांना आम्ही ठोकर मारतो पण तुम्ही देखील जरा तपास सुरु करा. फोटोग्राफीतून बाहेर येऊन इतके प्रचंड आरडीएक्स कसे आले? हे आपले राजकीय आणि गुप्तचर यंत्रेणेचे अपयश नाही का? गुप्तचर विभागातील लोक बिर्याणी खाऊन झोपले होते का? आपले ४० जवान मारले गेले त्याची जबाबदारी कोण घेणार? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हान ओवैसी यांनी दिले आहे.

- Advertisement -

औवेसी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे – 

  • मोदी सरकारच्या साडे चार वर्षाच्या कार्यकाळात फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आले आहे. द टेलिग्राफ या वृत्तपत्राने १४ फेब्रुवारी ते आतापर्यंत मोदींचे रोज हसऱ्या चेहऱ्याचे फोटो छापले आहेत.
  • देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले. त्या संविधानानुसार आपल्याला ७० वर्षात न्याय मिळाला आहे का? याचा विचार करा. आर्थिक निकषावर दिलेले आरक्षण संविधानाच्या विरोधात आहे.
  • लोकसभेत १८० राखीव जागा आहेत. पण त्यातला एकही खासदार तोंड उघडत नाही. एक खासदार तोंड उघडतो मात्र ते कविता, मस्करी करण्यासाठी.. रामदास आठवले यांच्यावर साधला निशाणा.
  • प्रकाश आंबेडकर यांचे वय आता ६० पेक्षा जास्त झालेले आहे. त्यांना काय मृत्यूनंतर तुम्ही सत्ता देणार आहात काय? माझा उद्देश मंत्री बनण्याचा नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जी मानवी मूल्य दिली आहेत, ती प्रत्यक्षात आणली जावीत.
  • देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी हे नवे पेशवा आहेत. ते संविधानाचे मूल्ये राबवणार नाहीत. तुम्हा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची ताकद फक्त प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची शपथ तुम्ही घ्या, असे आवाहन औवेसी यांनी केले.
  • आगामी निवडणुकीच्या प्रचारात रक्तपिपासू पक्ष पुन्हा तुमच्याकडे येतील. तुमचे मत मागतील पण त्यांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. ठाकरे, फडणवीस, मोदी, पवार आणि राहुल गांधी उद्याच्या निवडणुकीत जेव्हा धनशक्तीचा वापर करतील तेव्हा त्यांच्या आमिषाला बळी न पडता प्रकाश आंबेडकर यांच्यामागे शक्ती उभी करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -