मुंबईतील सीमएसएमटी येथील पूल दुर्घटनेनंतर वसई तालुक्यातील धोकादायक सोपारा खाडी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पुलावरून नागरिक दररोज मोठ्या संख्येने जीव मुठीत धरून ये-जा करत असतात. हा पूल अतिशय जीर्ण झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती आहे. असे असताना पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सीएसएमटी सारखीच घटना याठिकाणीदेखील घडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील घटनेनंतर आता तरी शहाणे होऊन तरी पीडब्ल्यूडी प्रशासनाने धोकादायक सोपारा खाडी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
नवीन सोपारा खाडी पूल जलदगतीने पूर्ण व्हावा, या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसरीकडे शिवसनेनेदेखील आक्रमक पवित्रा घेत पुलाच्या कामासाठी पीडब्ल्यूडी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेस पीडब्ल्यूडी प्रशासनाने आश्वासन देऊन सोपारा खाडी पुलाचा प्रश्न अधांतरी सोडला आहे.
ज्या खाडीवर हा पूल उभारण्यात आला आहे. तो जुना सोपारा खाडी पूल सध्या हेलकावे खात उभा आहे. पादचार्यांच्या सोयीसाठी प्रशासनातील कर्मचार्यांनी नवीन पुलाला पायर्यांचा टेकू दिला आहे. परंतु पादचारी पायर्या चढून जाण्याचे कष्ट न घेता धोकादायक पुलावरूनच ये-जा करणे पसंत करत आहेत. मध्यंतरी या पुलाला पडलेल्या भगदाडांमुळे लहान मुलांचे पाय त्यात अडकून त्यांना इजा झाल्याच्या दोन ते तीन घटना याठिकाणी घडल्या आहेत. असे असतानाही पीडब्ल्यूडी प्रशासनाकडून होत असलेल्या पुलाच्या कामकाजातील दिरंगाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सोपारा खाडी पुलासंदर्भात चर्चा, निवदने, आंदोलने करूनही पीडब्ल्यूडी प्रशासनाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता, ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे पूलाचे काम संथगतीने सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.