घरमुंबईआंबोली धरणामुळे मुरुडची पाणी समस्या निकाली

आंबोली धरणामुळे मुरुडची पाणी समस्या निकाली

Subscribe

सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या आंबोली धरणात प्रचंड पाणी साठा आहे. तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊन नागरिकांना येथून मुबलक पाणी पुरवठा होत असतो. शहराला या धरणामधूनच पाणी पुरवठा झाल्याने मे अखेर जाणवणारी पाणी टंचाई त्यामुळे दूर झाली आहे.

नवाब कालीन तालुका अशी मुरुडची ओळख असून, शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी नबाबाने बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त 7 हजार होती. परंतु हा आकडा 16 हजारावर गेला आहे. सलग सुट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर बाब असे. मात्र आंबोलीचे धरण आता दिलासा देणारे ठरले आहे. ज्यावेळी गारंबी धरणाचे पाणी उपलब्ध होते त्यावेळी हे धरण खूपच छोटे असल्याने मे महिन्यातच पाणी अपुरे पडत असे. अशावेळी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी खूप दूरवरून पायपीट करावी लागत होती. तसेच पर्यटकांनासुद्धा पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता. परंतु महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेत आंबोली धरणासाठी मान्यता दिल्याने या जल साठ्यामुळे पाणी प्रश्न सुटला आहे. मुबलक पाण्यामुळे मोठे क्षेत्र जल सिंचनाखाली येऊन सुमारे 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

- Advertisement -

हजारो पर्यटक पावसाळी हंगामात आंबोली धरणाला भेट देऊन पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असतात. या धरणामुळे मुरुडला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. धरण लघु पाटबंधारे खात्यांतर्गत येत असून, या धरणाची सर्व सुरक्षा या खात्याच्या ताब्यातच येत आहे. शहरात वर्षभरात येणार्‍या पर्यटकांची संख्या पाच लाखापेक्षा अधिक आहे. पावसाळ्यात किमान 50 हजार पेक्षा जास्त पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे पहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे.

आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते त्यावेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात असंख्य महिला व पुरुष पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असतात. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान 10 किलोमीटर परिसरात असणार्‍या गावांनासुद्धा काही निवडक कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या भागातील काही शेतकरी दुबार शेतीसुद्धा करीत असतात. एकंदर या धरणामुळे पर्यटन व स्थानिक शेतकरी यांना मोठा दिलासा मिळून सुमारे 50 हजार नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

- Advertisement -

या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जेथपर्यंत कालवे आहेत तेथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते. तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरडे पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे, अशी मागणी येथील काही शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत पोहचविण्यात येऊन तेथील जल सिंचन मर्यादा वाढविण्यात आल्यास येथील शेतकरीसुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात. यासाठी शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन देऊन कालव्यांची कामे पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर ,कोबी, मिरची,कोथिंबर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे आदी महत्त्वाची पिके घेऊन सधन होताना दिसत आहे. तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या-छोट्या टपर्‍या, खानावळी व हॉटेल यांचा धंदासुद्धा तेजीत आला आहे. या एका धरणामुळे सुबत्ता आल्याने स्थानिकांच्या राहणीमानाचा दर्जाही उंचावल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -