‘राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माझ्यावर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी’, अशी मागणी घोडबंदर रोड येथील नागरिक अनंत करमुसे यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही त्याने केली आहे. एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल अनंत करमुसे या युवकास बेदम मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरुन त्यांच्यासमक्षच झाली असल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.
“राज्यात लॉकडाऊन सुरू असताना ५ एप्रिल रोजी मला घोडबंदर रोड येथील माझ्या घरातून नेण्यात आले. त्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलिस सुरक्षा रक्षक आणि गुंडांचा सहभाग होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात आव्हाडांसमोर मला बेदम मारहाण करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरू असताना, मंत्री आव्हाड यांच्याकडून पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी”, अशी मागणी मारहाण झालेले नागरिक अनंत करमुसे यांनी केली आहे.
खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची ठाण्यात आज भेट घेऊन करमुसे यांनी निवेदन दिले. तसेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. या वेळी आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, सुजय पत्की, अनिरुद्ध गानू यांची उपस्थिती होती.