तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने प्रवास करणे त्रासदायक होत आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनसेच्यावतीने मंगळवारी जय जय रामकृष्ण हरी.., कर्जतचे रस्ते लईच भारी, अशा उपहासात्मक घोषणा देत टाळ नाद आंदोलन करण्यात आले. दहिवली ते आकुर्ले रस्ता, चांदई ते भिवपुरी, गणेगाव ते नसरापूर, कशेळे- खांडस परिसर, गौळवाडी वैजनाथ, आकुर्ले ते सांगवी आदी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, मोठे खड्डे पडले आहेत.
पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहन आपटून अपघात होत आहेत. शिवाय वाहनांचेही नुकसान होत आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सांगून, तसेच निवेदन देऊन पाठपुरावा केला असूनही रस्त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर मनसेच्यावतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी टाळ नाद आंदोलन करण्यात आले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले. मात्र तेथे संबंधित अधिकारी तथा अभियंता उपस्थित नसल्याने रिकाम्या खुर्चीला हार, श्रीफळ आणि शाल पांघरून ‘सन्मान’ करण्यात आला. यावेळीही घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र निगुडकर, तालुका उपाध्यक्ष विलास डुकरे, शहराध्यक्ष समीर चव्हाण, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, अक्षय महाले, संजय तन्ना, चिन्मय बेडेकर, मनविसे तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर, उपाध्यक्ष दिनेश बोराडे, निवृत्ती गोसावी, राजेश साळुंखे, प्रज्योत घोसाळकर, महिला उपाध्यक्षा आकांशा शर्मा ,महेश लोवंशी, संदेश काळभोर, शुभम दुर्गे, दीप्तेश शेळके, पारस खैरे, टिंकू लोभी, मिलिंद लदगे, सुशांत चव्हाण, वल्लभ चितळे उपस्थित होते.
मागील काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून समस्यांबाबत पाठपुरावा करीत होतो. मात्र अभियंत्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कामात कुचराई करणार्या अधिकार्यांचा टाळांच्या गजरात मानाचा जाहीर सत्कार करण्यात आला, असे कर्जतचे मनसे शहराध्यक्ष
समीर चव्हाण यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – अजोय मेहतांच्या अडचणीत वाढ, ED – IT कडून अविनाश भोसलेंच्या कंपनीचे संचालक निखिल गोखलेंची चौकशी