राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. अस्वस्थ वाटत असल्याने जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते मंत्रीमंडळाच्या बैठकीतून बाहेर आले. त्यानंतर त्यांना आता रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील यांच्यासह इतर काही मंत्री रुग्णालयात पोहोचले आहेत. माहितीनुसार जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान त्यांच्या प्रकृती संदर्भातील बातमी समोर येताच त्यांनी स्वतः ट्विट करून रुग्णालयात गेल्याची माहिती दिली आहे.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 28, 2021
नुकताच जयंत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. कोल्हापूरमधल्या पूर परिस्थितीची पाहणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत केली. तसेच मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. यामुळे नदीकाठच्या गावात आणि सांगलीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अशा परिस्थितीत रस्त्यावर उतरल्याचे दिसले. कधी बाईकवरून, कधी ट्रॅक्टरने, तर कधी पाण्यात बोटीने जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना धीर दिल्याचे पाहायला मिळाले.
पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील यांनी २४ जुलैला पाहणी दौरा सुरू केला होता. तब्बल १२ तासानंतरही हा दौरा सुरू होता. माहितीनुसार आतापर्यंत मंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील जवळपास १५ पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत.