राजस्थानमधील हनुमानगड येथे आज सोमवारी (ता. 08 मे) सकाळी मिग-21 हे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे बहलोल नगर भागातील एका घरावर हे लष्कराचे विमान पडल्याने या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Army MiG-21 plane crashes on house in Rajasthan, two killed) त्याचबरोबर या अपघातातील एक पुरूष गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या लष्करी विमानाच्या पायलटने प्रसंगावधान दाखवत पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारल्याने तो बचावला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. Two civilian women died and a man was injured in the incident, the pilot sustained minor injuries. pic.twitter.com/z4BZBsECVV
— ANI (@ANI) May 8, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, मिग 21 हे सिंगल सीटर विमान होते. विमान क्रॅश होण्याच्या काही मिनिटांपूर्वी वैमानिकाने तांत्रिक बिघाडाची तक्रार केली होती. जेव्हा विमान पृथ्वीच्या दिशेने वेगाने जाऊ लागले तेव्हा पायलटने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली. तर अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती.
विमान अपघातांची मालिका सुरूच…
जानेवारीच्या सुरुवातीला, राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान सुखोई एसयू-30 आणि मिराज 2000 ही दोन भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने कोसळली होती. या अपघातात पायलटला जीव गमवावा लागला. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळले, तर दुसरे विमान राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले होते. त्याचवेळी, गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. कोची येथे एप्रिलमध्ये कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणादरम्यान क्रॅश लँडिंग करताना दुसरा अपघात झाला होता.
ऑक्टोबरमध्ये कोसळली होते लष्कराचे दोन हेलिकॉप्टर
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करातील हेलिकॉप्टर अपघाताच्या दोन घटना समोर आल्या होत्या. 5 ऑक्टोबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चीता हेलिकॉप्टर क्रॅश होऊन भारतीय लष्कराच्या पायलटचा मृत्यू झाला होता. तर या घटनेच्या काही दिवसांनंतर म्हणजेच 21 ऑक्टोबर 2022 रोजी, भारतीय लष्कराच्या एव्हिएशन अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरच्या अपघातात पाच संरक्षण कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तोटींगपासून २५ किमी अंतरावर असलेल्या सियांग गावाजवळ ही घटना घडली होती.
हेही वाचा – Malappuram disaster : बोट उलटल्याने २१ जणांचा मृत्यू, बहुतांश मुलांचा समावेश