अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटल्याचा दावा विजय माल्ल्यानं केल्यानंतर आता अरूण जेटलींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौफेर हल्ला चढवला आहे. संसदेच्या आवारातच अरूण जेटली आणि विजय माल्ल्याची २० मिनिटं भेट झाली. यावेळी माल्ल्या भारतातून पळून जाणार होता हे जेटलींना माहित होते. त्यामुळे विजय माल्ल्याला वाचवण्याचे आदेश होते का? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच ही माहिती लपवल्यामुळे अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी यावेळी अरूण जेटली यांच्यावर टीका केली.
#WATCH “I met the Finance Minister before I left, repeated my offer to settle with the banks”, says Vijay Mallya outside London’s Westminster Magistrates’ Court pic.twitter.com/5wvLYItPQf
— ANI (@ANI) September 12, 2018
काय म्हणाले राहुल गांधी?
अर्थमंत्री अरूण जेटली आणि विजय माल्ल्याची संसदेच्या आवारात १५ ते २० मिनिटं भेट झाली. काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा अर्थमंत्री घोटाळेबाजांशी चर्चा करतो. शिवाय, देश सोडण्याबद्दल त्यांना माहिती देखील देतो. त्यानंतर देखील जेटली सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवतात?. जेटली खोटं बोलत आहेत. भारतीय जनतेसमोर त्यांनी सत्य मांडावं अशी मागणी यावेळी राहुल गांधी केली आहे. शिवाय, माल्ल्या देश सोडून जाण्यास अरूण जेटलीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? त्यांना वरून आॉर्डर आली होती का? असे अनेक सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. तसेच अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे.
This is a clear-cut case of collusion. There is some deal between them? FM @arunjaitley must resign and this should be investigated: Congress President Shri @RahulGandhi on #ArunJaitleyStepDown pic.twitter.com/APrDxeAwKD
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 13, 2018
‘सीसीटीव्ही तपासून पाहा’
अर्थसंकल्पाच्या पूर्वी म्हणजेच १ मार्च रोजी अरूण जेटली आणि विजय माल्ल्या संसदेमध्ये जवळपास १५ ते २० मिनिटं बोलत होते. अगोदर उभे राहुन दोघांनी चर्चा केली. त्यानंतर दोघेही सेंट्र्ल हॉलमध्ये गेले आणि चर्चा केली. त्यानंतर केवळ दोनच दिवसानंतर विजय माल्ल्या देश सोडून पळाला. ही बातमी वाचल्यानंतर मला धक्का बसला. संसदेतील सीसीटीव्ही तपासून पाहिल्यास सत्य बाहेर येईल असे काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी म्हटले आहे.