केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात भारत बंद आंदोलन केले जात आहे. याचदरम्यान, सिंघु सीमेवर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर पोस्टमार्टम नंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असे शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
भारत बंदवर संयुक्त किसान मोर्चाने पत्रक जारी केली आहे. यात भारत बंदला देशभरातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाब, हरयाणा, केरळ आणि बिहारमध्ये सगळंच बंद असून येथील संस्थान, बाजारपेठा आणि दळणवळणही बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्येही बंदला प्रतिसाद मिळत असल्याचे या पत्रकात सांगण्यात आले आहे.