घरदेश-विदेशकर्नाटक पराभव भाजपच्या जिव्हारी, खासदारांच्या कामकाजाचे मागवले रिपोर्ट कार्ड

कर्नाटक पराभव भाजपच्या जिव्हारी, खासदारांच्या कामकाजाचे मागवले रिपोर्ट कार्ड

Subscribe

30 मे ते 30 जून दरम्यान महिनाभर चालणाऱ्या 'विशेष जनसंपर्क अभियाना'अंतर्गत देशातील 396 लोकसभा मतदारसंघात भाजप पक्षाकडून जनतेशी संवाद साधला जाणार आहे. दरम्यान, यावेळी खासदारांनी त्यांच्या भागात केलेल्या कामांची माहिती राज्यातील नेत्यांकडून जमा केली जाणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने भाजपने आपल्या सर्व खासदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहेत. सर्व प्रदेशाध्यक्षांनी महिनाभरात सर्व खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातील कामांचा आढावा घेऊन पक्षाच्या केंद्रीय युनिटला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात केलेल्या कल्याणकारी कामांची स्थिती, खासदारांची लोकांमध्ये असलेली लोकप्रियता, मतदारसंघात घालवलेला वेळ आणि सोशल मीडियावरील त्यांची सक्रियता याच्या आधारे खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे. 2024 मध्ये लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी या रिपोर्ट कार्डचा वापर होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. याआधीही खासदार आणि मंत्र्यांकडून आपापल्या भागात झालेल्या कामांची माहिती मागवण्यात आली होती.

70 कमकुवत लोकसभांवर लक्ष
30 मे ते 30 जून दरम्यान महिनाभर चालणाऱ्या ‘विशेष जनसंपर्क अभियाना’अंतर्गत देशातील 396 लोकसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधला जाणार आहे. दरम्यान, खासदारांच्या क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती राज्यातील पथकांकडून जमा केली जाणार आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, त्यांच्याकडे येत्या वर्षभरात विशेष लक्ष केंद्रीत करून जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षाने 70 कमकुवत लोकसभा मतदारसंघांची निवड केली असून ज्याठिकाणी पक्षाने थोड्या फरकाने विजय मिळवला आहे, अशा सर्व लोकसभा मतदारसंघात विशेष काम करून जनतेशी संपर्क वाढवला जाणार आहे.

- Advertisement -

आगामी निवडणुकांची भाजपला चिंता
कर्नाटक निवडणुकीच्या निकालामुळे भाजपची पुढील विधानसभांची चिंता वाढली आहे. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील पराभवाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याचा पक्षाकडून सखोल अभ्यास करण्यात येत आहे. या वर्षी होणार्‍या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होईल, याचाही अंदाज घेतला जात आहे.

भाजपला छत्तीसगड-राजस्थान राज्यातील निवडणुकांची चिंता
छत्तीसगडमध्ये निवडणूकांचा निकाल काय लागू शकतो, याबाबत पक्षांतर्गत आतापासूनच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेल्या सत्ताविरोधी घटकाबाबत माहिती काढली जात आहे. राजस्थानमधील सत्ताधारी पक्षातील भांडणातही ‘वसुंधरा फॅक्टर’ पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला त्रास देत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यांमध्ये कमकुवत पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मनस्थितीवर याबाबतचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

- Advertisement -

त्यामुळे आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, अशा राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी सखोल काम केले जात आहे. हे लक्षात घेऊन पक्ष विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत या राज्यांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून आहे. या राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या अधिकाधिक जाहीर सभा घेऊन भाजपसाठी चांगली वातावरण निर्मिती केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -